पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला तीनशे शब्दांचा निबंध, तसेच वाहतूक पोलिसांबरोबर १५ दिवस काम करण्याच्या अटी, शर्तींवर जामीन मंजूर करणाऱ्या बाल न्याय मंडळातील दोन अशासकीय सदस्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस महिला आणि बाल कल्याण आयुक्तांनी केली आहे.

बाल न्याय मंडळाच्या सदस्यांनी दिलेल्या निर्णयाची चौकशी करण्यासाठी महिला आणि बाल कल्याण विभागाकडून समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने शंभरहून अधिक पानांचा अहवाल बाल कल्याण विभागाकडे नुकताच सादर केला. मुलाला जामीन मंजूर करण्याच्या प्रक्रियेत सदस्यांनी पुष्कळ चुका केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. संबंधित अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात आला. बाल न्याय मंडळातील सदस्यांवर कारवाईची शिफारस करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा…प्राध्यापक भरती करा, ‘यूजीसी’कडून सहाव्यांदा निर्देश…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याणीनगर भागात १९ मे रोजी मध्यरात्री अपघात होऊन भरधाव मोटारीच्या धडकेत संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात बांधकाम व्यावसाायिक विशाल अगरवाल याच्या मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर १५ तासांत मुलाला बाल न्याय मंडळाने जामीन मंजूर केला होता. वाहतूक प्रश्नावर ३०० शब्दांचा निबंध लिहावा, वाहतूक पोलिसांसोबत १५ दिवस चौकात वाहतूक नियोजन करावे, तसेच व्यसनमुक्तीसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात यावे, अशा अटी-शर्तींवर मुलाचा जामीन मंजूर करण्यात आला होता. या निर्णयावर संतप्त प्रतिक्रिया उमटली होती.