“आजचा शेतकरी हा केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पिचलेला आहे. महात्मा फुले यांनी १८८३ मध्ये शेतकऱ्याच्या अवस्थेचे एवढे प्रभावी व वास्तवदर्शी चित्रण केले असून त्याला तोड नाही. वर्तमानात यात किंचीतही बदल झालेला नाही. त्यामुळे या चुकीच्या शेती विषयक धोरणांच्या विरोधात हाच आसूड उगारण्याची वेळ आली आहे” असे मत खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.

खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रवींद्र धंगेकर या तीनही महाविकास आघाडीच्या उमेदवारानी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले वाड्यात अभिवादन केले. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना कोल्हे यांनी भाजपावर टीका केली आहे.

हेही वाचा… पुणे : नागरिकांना अडवून पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीय, भिक्षेकऱ्यांविरुद्ध खंडणीचे गुन्हे दाखल करा; पोलीस आयुक्तांचा आदेश

महात्मा फुले यांनी १८८३ मध्ये ‘शेतकऱ्याचा असूड’ हा  ग्रंथ लिहिला. शेतकऱ्याच्या विदारक परिस्थितीचे चित्रण यात करून त्याच्या विकासाचा मार्गही सांगितला. सध्या कांदा उत्पादक शेतकरी असो की सोयाबीन, दूध उत्पादक शेतकरी असो केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अल्पभूधारक शेतकरी हा नागवला जात आहे. त्याविरोधात आवाज उठवण, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे हेच महात्मा फुले यांना अभिवादन असणार असल्याचं डॉ.अमोल कोल्हे यांनी सांगितले.

हेही वाचा… दिवसा डिलीव्हरी बॉय, रात्री सायबर क्रिमिनल; कोट्यवधीची फसवणूक करणारे आरोपी जेरबंद

‘गेट वेल सून’ – अमोल कोल्हे

पाच वर्षात पाच पक्ष बदल्यामुळे शिरुर लोकसभा मतदार संघ बदनाम झाल्याची टीका शिरुर लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली आहे.त्या प्रश्नावर अमोल कोल्हे म्हणाले की,कदाचित त्यांच्या समोर आरसा असेल आणि मी त्यांना एवढ्याच शुभेच्छा देईल की,’गेट वेल सून’ कारण हे सन्माननीय महोदय कांदा निर्यात बंदी,दूध उत्पादक शेतकरी यांच्या बाबत बोलले असते.तर मला दिलासा मिळाला असता,त्यामुळे बेडूक उड्या मारून विनाकारण टीका करणे,तसेच खोट बोल पण रेटून बोल अशा पद्धतीची विधानं केली जात आहे. त्यामुळे मी त्यांच वय लक्षात घेता,’गेट वेल सून’ मी एवढ्याच त्यांना शुभेच्छा देईल अशा शब्दात शिवाजीराव आढळराव पाटील यांना टोला लगावला.