पुणे : आषाढी वारीत लाखो वारकरी सहभागी होतात. या वारकऱ्यांना स्वच्छ आणि चांगले खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मोहीम हाती घेतली आहे. पालखी मार्गांवर खाद्यपदार्थ तपासणीसाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. ही पथके रस्त्यांवरील खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि हॉटेलांची तपासणी करीत आहेत.

आषाढी वारी ही पावसाळ्यात असल्यामुळे खाद्यपदार्थ दूषित होण्याची शक्यता असते. त्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढतो. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने तपासणीसाठी तीन पथके नियुक्त केली आहेत. यातील प्रत्येक पथकामध्ये सहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ही पथके पालखी मार्गावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांची तपासणी करीत आहेत. त्यात खाद्यपदार्थ बनविताना स्वच्छता बाळगण्यात येत आहे का, याची तपासणी केली जात आहे. याचबरोबर खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत.

वारीच्या मुक्कामाच्या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाची पथके तैनात करण्यात आली आहेत. ही पथके रस्त्यांवरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांची तपासणी करीत आहेत. विक्रेत्यांकडील परवान्याचीही तपासणी केली जात आहे. विक्रेत्यांकडील खाद्यपदार्थ मुदतबाह्य आहेत का, यावरही पथकांची बारकाईने नजर आहे. विक्रेत्यांनी शिळे खाद्यपदार्थ विकू नयेत, अशी सक्त ताकीद प्रशासनाने केली आहे. त्याचबरोबर दुग्धजन्य पदार्थ योग्य तापमानात साठवून ठेवावेत आणि चांगल्या प्रतीच्या खाद्यतेलाचा वापर करावा, अशीही सूचना करण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या सूचना

खाद्यपदार्थ बनविण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करावा.

मुदतबाह्य खाद्यपदार्थांची विक्री करू नये.

खाद्यपदार्थ तळण्यासाठी खाद्यतेल २ ते ३ वेळाच वापरावे.

शिळ्या खाद्यपदार्थांची विक्री करणे टाळावे.

दुग्धजन्य पदार्थ योग्य तापमानात साठवून ठेवावेत.

अन्नातून विषबाधा होऊ नये, याची काळजी घ्यावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आषाढी वारीच्या मार्गावर पुण्यापासून पंढरपूरपर्यंत अन्न व औषध प्रशासनाची पथके खाद्यपदार्थांची तपासणी करणार आहेत. वारकऱ्यांना अन्नातून विषबाधा होऊ नये, यासाठी काळजी घेतली जात आहे. आषाढी यात्रेवेळी पंढरपूरमध्ये २० ते २५ अधिकारी तैनात असतील आणि ते यात्रेच्या काळात खाद्यपदार्थांची तपासणी करतील.सुरेश अन्नापुरे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन