लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : विसर्जन मिरवणुकीचा खर्च टाळून उत्सव मित्र मंडळाने सिंहगड रस्त्यावरील एकतानगरी येथे आलेल्या पुरामुळे घराचे नुकसान झालेल्या पांडुरंग त्रिंबक मानवदकर यांना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली. नवी पेठेतील गांजवे चौक येथील उत्सव मित्र मंडळाने जिवंत देखाव्यातून पुण्याचा वारसा जपण्याचे आवाहन केले आहे.

काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, उद्यम विकास सहकारी बँकचे संचालक दिनेश भिलारे, अनंत घरत, पत्रकार संभाजी पाटील यांच्या उपस्थितीत मानवदकर यांना आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. मंडळाचे कार्याध्यक्ष सुधीर काळे, अध्यक्ष अतुल धर्मे, सचिन गायकवाड, विनय कदम, सुमित काळे, विजय लोणकर, तुषार सस्ते, सुनील वाबळे, धनंजय लोणकर, प्रतीक काळे, बाळासाहेब कांबळे, शैलेश कदम, अनिल तापकीर, आकाश खराटे या वेळी उपस्थित होते.

आणखी वाचा-राज्य परीक्षा परिषदेतर्फे ‘टीईटी’ची घोषणा… कधी होणार परीक्षा, अर्ज कधीपासून उपलब्ध?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यंदाच्या गणेशोत्सवामध्ये मंडळाने ‘वारसा पुण्याचा, पुन्हा जपूया’ हा जिवंत देखावा सादर केला आहे. विद्येचे माहेरघर ते वाहतुकीचे शहर, गुन्हेगारी-व्यसनांचे आगर अशी पुण्याची बदललेली ओळख ही व्यथा या जिवंत देखाव्यात मांडली आहे. जुन्या पुण्याची सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक ओळख पुन्हा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन या देखाव्यातून करण्यात आले आहे. जिवंत देखाव्याची संकल्पना संतोष शिकरे यांची आहे. उत्सव मित्र मंडळची स्थापना १९७२ साली झाली असून मंडळ दरवर्षी विसर्जन मिरवणुकीचा खर्च टाळून हा निधी विविध सामाजिक उपक्रमांवर खर्च करत असते, असे मंडळाचे कार्याध्यक्ष सुधीर काळे यांनी सांगितले.