बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितल्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आम्ही मदत केली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे राजकारणात आले. मात्र, आता ते निवडणुकीच्या काळात सरकारी संस्थांचा गैरवापर करत आहेत. त्यांच्या घरात अनेक कारखान्यांचे आणि विविध प्रशासकीय कर्मचारी असून, त्यांचा वापर ते करत आहेत.’ असा आरोप माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष, भाजप नेते चंद्रराव तावरे यांनी केला.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘निळकंठेश्वर पॅनल’समोर चंद्रराव तावरे यांचे ‘सहकार बचाव पॅनल’ उभे करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना तावरे यांनी ही टीका केली.

तावरे म्हणाले, ‘अजित पवार यांना राजकारणात आम्ही आणले. शरद पवार म्हणाले म्हणून आम्ही त्यांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मदत केली आणि ते राजकारणात आले. पूर्वी ते कुठे बसत होते आणि आता कुठे बसतात हे पहा. चौकशी होऊ नये म्हणून ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे जात असतात.’

‘अजित पवारांचा कारभार शेतकरी हिताचा नाही. त्यांचे कारखाने एक कोटी टन ऊस दरवर्षी घालतात. आम्ही २०० रुपये प्रति टन ऊस दर जास्त दिला, तर अजित पवारांना १०० कोटी रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. त्यामुळेच ते माळेगाव कारखाना स्वतःच्या हातात ठेवण्याची धडपड करत आहेत.’ असेही तावरे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘ब’ वर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावर तावरे म्हणाले, ‘ ही लोकशाही आहे. ज्याचे त्याला कळाले पाहिजे. कारखाना आम्हाला पुढे न्यायचा आहे. शेतकऱ्याला जास्त पैसे द्यायचे आहेत. आम्ही चांगला भाव देतो. त्यामुळे त्यांच्या खासगी कारखान्याला त्रास होतो.