पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरातील घाऊक बाजारात १७५ एकर क्षेत्रावर हजार गाळ्यांची रचना आहे. त्यापैकी भाजीपाला ५००, फळवाले २५०, कांदे बटाटे २०० आणि पानवाले, केळी यांचे साधारण ५० गाळे आहेत. भारतीय संस्कृतीचा विचार करताना वैविध्यपूर्ण निसर्ग, कृषिप्रधान संस्कृती, प्रादेशिक विविधता लक्षात घेता अभिरुची बदलली असली तरी फळांचे महत्त्व कायम टिकून आहे किंवा वाढते आहे, असे दिसते. प्रतीकात्मक ईश्वरपूजा करताना पूजन साहित्यामध्ये फळांना मानाचे स्थान देणारी एकमेव संस्कृती आपलीच आहे. कर्मफळ या एकाच शब्दामध्ये ध्येय, कष्ट, यश, सकारात्मकता असे अनेक अर्थ सामावल्याचे लक्षात येते. रामायण, महाभारतामध्येसुद्धा फलाहाराचे संदर्भ सापडतात. प्रस्तुत लेखामध्ये फळ बाजारपेठेच्या भ्रमंतीतून काही ऐतिहासिक, वर्तमानकालीन तसेच भविष्यातील बाजारपेठेचा वेध घेण्याचा प्रयत्न आहे. फळा-फुलांच्या, भाजीपाल्याच्या बाजारपेठेचा वेध घेताना पुण्यनगरीच्या इतिहासाची काही पाने चाळणे आवश्यक ठरते. दर्जेदार कलात्मक आणि उच्च अभिरुचीच्या, तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या व्यापाराचे पुणे हे भारतातील महत्त्वाचे केंद्र होते. बहराच्या त्या काळात पुण्याची लोकसंख्या पंचाहत्तर हजारावर होती. पेशवाईच्या अस्तानंतर नागरी वस्ती, व्यापार उद्योग आणि एकूणच अर्थकारणाला ओहोटी लागल्याची माहिती इतिहासाचे अभ्यासक मंदार लवाटे यांनी दिली. भाजीपाला आणि फळांचा विखुरलेला बाजार नंतर शनिवारवाडय़ाच्या पटांगणात केंद्रित झाला. पुढे शहराच्या वाढत्या विस्तारामुळे रे मार्केटची (सध्याची महात्मा फुले मंडई) उभारणी झाली. तिचा विस्तार झाला तरी कालांतराने मध्यवस्तीतील ही जागादेखील अपुरी पडू लागल्याने १९७७ नंतर सद्य:स्थितीतील मार्केटयार्ड परिसरात भाजीपाला, धान्य, फळे, फुलांचा बाजार टप्प्याटप्प्याने स्थलांतरित होत गेला. आता चाळीस वर्षांनंतर मार्केटयार्डसुद्धा अपुरे पडू लागल्याने पुन्हा एकदा शहरापासून लांब, परंतु हमरस्त्याच्या लगत स्थित्यंतराची मागणी होत आहे. सुमारे शतकाच्या कालावधीत फळांच्या बाजारपेठेत काय बदल झाले, किती व्याप्ती वाढली, नवी आव्हाने कोणती, त्यांचा सामना कसा होतो अशा अनेक बाबींचा संक्षिप्त आढावा मांडत आहे. पुण्यातील फळबाजाराचा गेल्या शतकाचा आढावा घेताना सुरुवातीच्या काळातील काही शेतकरी, व्यापारी, घराण्यांचा उल्लेख अपरिहार्य ठरतो. उरसळ, खैरे, बोराटे, बनवारी, काची, ढमढेरे अशी मंडळी पिढय़ान्पिढय़ा या व्यवसायात ठामपणे कार्यरत आहेत. बोरकर, म्हेत्रे, तावरे यांचा उल्लेखही आवश्यक आहे. १९२० च्या सुमारास तीव्र दुष्काळी स्थितीमुळे खैरे, उरसळ ही मंडळी पुरंदर परिसरातून पुण्यात स्थलांतरित झाली आणि महात्मा फुले मंडईत व्यापारात त्यांनी जम बसवला. त्याकाळी पूर्वजांनी डोक्यावर पाटय़ा घेऊन विक्री केली. आता मात्र नवी पिढी हजारो टनांचा व्यवसाय अत्याधुनिक तंत्रज्ञानासह करीत आहे. पुण्यनगरीच्या बाजारपेठेचा विचार करताना शनिवारवाडय़ाच्या पटांगणातील बाजारपेठेचे स्वरुप सध्याच्या ग्रामीण आठवडे बाजारासारखेच होते, हे लक्षात येते. पुण्याचा मानबिंदू असलेली महात्मा फुले मंडईची वास्तू उभी झाल्यानंतर या परिसरात बाजारपेठेचा विकास होऊन सर्वार्थाने आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाला बहर आला. तो महत्त्वाचा काळ ठरला. व्यापाराबरोबरच देव, देश आणि धर्माची शिकवण इथे मिळाल्याने ‘मंडई विद्यापीठ’ ही संज्ञा रूढ झाली. फळांच्या बाजारपेठेचे अर्थकारण समजून घेताना शेतमालाचे भाव हा किती संवेदनाक्षम विषय आहे, हे लक्षात येते. शेतकरी, आडते आणि किरकोळ विक्रेते अशी व्यापाराची साखळी इथे अस्तित्वात आहे. आडते मंडळींना ६ टक्के कमिशन मिळते, तर किरकोळ व्यापाऱ्यांना त्यांचे व्यावसायिक खर्च आणि वस्तीचा विचार करून दर ठरवावे लागतात. स्थिरस्थावर दुकानाचे जसे खर्च ठरलेले असतात तसेच रस्त्यावर व्यापार करणाऱ्यांना अनेक घटकांचा जाच लक्षात घेऊन मालाची किंमत ठरवावी लागते. खरेदीच्या २५ ते ३० टक्के अधिक अशी ही किंमत असते. फळांची नाशवंतता किंवा टिकण्याची क्षमता हा घटकसुद्धा या व्यापारात महत्त्वाचा असतो. पूर्वी या व्यापारात अनेक वर्षे ‘हत्ता’ पद्धत अस्तित्वात होती. आडते आणि किरकोळ व्यापारी दोघेही रुमालाखाली हात धरून सांकेतिक भाषेत दर ठरवत असत. हातमिळवणीतून होणारा व्यापार म्हणून ‘हत्ता’ हे नाव पडले. मंडई विद्यापीठातील व्यापारामध्ये, शब्दकोषामध्ये अस्तित्वात नसलेले काही शब्द सर्वसामान्यांच्या कुतूहलापोटी देत आहे. नामा- २० किंवा ४० फळांचा ढीग, बदला माल- टाकाऊ, दुय्यम दर्जा, शवत माल- दर्जेदार, गुणवत्ता पूर्ण, डंक- झाडावर नैसर्गिकरीत्या पिकवलेले चिकू, बिछाईत- आदल्या दिवशी विक्रीसाठी माल घेऊन येणारा आणि आडत्याकडे मुक्कामाला राहणारा, तरकारी- फळभाजी, पालेभाजी. आकडेवारी- कैला (१), चपडा (२), रख (३), फोक (४), बुध (५), डेक (६), लंगडा (७), मांजी (८), कौन (९) आणि सला (१०) असे नामांकन आहे. ते कोणी केले आणि कसे झाले याचे उत्तर कधीही शोधू नये. कारण ही सर्व मंडई विद्यापीठातील आकडेवारी आहे. मंडईत पूर्वी गावाजवळच्या तीस-चाळीस किलोमीटरच्या टापूतील माल विक्रीस येत होता, तो मुख्यत्वे बैलगाडय़ांतून. मात्र वाहनक्षेत्रातील क्रांतीमुळे हा परीघ विस्तारत गेला. आता जग हेच खेडे झाल्याचे मानले जाते. बाजारपेठेत फळे कोठून येतात हे या निमित्ताने जाणून घेऊ. अंजिर, सीताफळ- पुरंदर, आंबा- रत्नागिरी, बेळगाव, बंगलोर, हैदराबाद, बलसाड, अननस- केरळ, गोवा, केळी- जळगाव, इंदापूर, द्राक्षे- सोलापूर आणि नाशिक जिल्हा, चिकू- डहाणू. हवाई वाहतूक आणि कोल्ड स्टोअरेजच्या उपलब्धीमुळे इराण, युरोपीय देश, तसेच चीन, अमेरिकेतून मुख्यत्वे सफरचंद, पेअर आणि द्राक्षे आयात होतात. इजिप्त आणि आफ्रिकेतून संत्री, तसेच थायलंडवरून ड्रॅगनफ्रूट आणि गोड चिंच आयात होते. भारतातून निर्यात होणाऱ्या फळांपैकी आंबा आणि द्राक्षे यांना जगभरातून मागणी असते. उत्तम गुणवत्ता, आकर्षक पॅकिंग आणि सुलभ वाहतूक हे घटक जागतिक बाजारपेठेत महत्त्वाचे ठरतात. बाजार कायदा १९३६ मध्ये अस्तित्वात आला, परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी १ जुलै १९७७ ला झाली. येथील व्यापाऱ्यांची श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशन ही अधिकृत संघटना असून, सर्व गाळेधारक (१०००) सभासद आहेत. बाजारपेठेतील भ्रमंतीतून फळांच्या प्रजातींची अनेक नावे समजली, जी सर्वसामान्यांना नवी वाटतील. डाळिंब- गणेश, आरक्ता, भगवा, मोसंबी- माल्टा, द्राक्ष- शरद सीडलेस, सोनाका, खरबूज- कुंदन, बॉबी, पायनापल- राणी, राजा, बोरे- चेकनट, अॅपल बोर, कलिंगड- शुगरबेबी. संत्री, मोसंबीच्या नव्या सीडलेस जाती प्रायोगिक अवस्थेत असल्याची माहिती मिळाली. आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ असून, अमोल घुले, युवराज काची हे उपाध्यक्ष आहेत. रोहन उरसळ हे सचिव असून, खजिनदारपदी सूर्यकांत थोरात आहेत. फळबाजारात रोज सुमारे २५० टन मालाची आवक असून, ९५ टक्केपेक्षा अधिक मालाला दैनंदिन उठाव आहे. फळांच्या बाजारपेठेची भ्रमंती करताना असे लक्षात आले, की एकेका गाळ्याच्या माध्यमातून किमान पंचवीस जणांना रोजगार उपलब्ध होत आहे. फळ व्यापाऱ्यांच्या नव्या उच्चशिक्षित पिढीतील तरुण मंडळी या व्यवसायाकडे आत्यंतिक सकारात्मकतेने पाहात आहेत. संदीप खैरे, सौरभ कुंजीर, स्वप्नील ढमढेरे आणि सिद्धार्थ खैरे असे नव्या दमाचे तरुण आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने लौकिक वाढविण्यासाठी या व्यवसायाकडे लक्ष देत आहेत. या लेखनासाठी उपयुक्त माहिती आणि संदर्भ देणारे नाथसाहेब खैरे, सुभाष बोरकर, रोहन उरसळ आणि गणेश शेवाळे यांचाही उल्लेख येथे करायला हवा.