पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल गेल्यावर्षीपेक्षा लवकर जाहीर केला जाणार आहे. त्याबाबतचे संकेत राज्य मंडळानेच दिले आहेत.

राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च या दरम्यान घेण्यात आली. दहावीच्या परीक्षेसाठी १६ लाख विद्यार्थ्यांनी, तर बारावीच्या परीक्षेसाठी १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या काही दिवसांपासून दहावी-बारावीच्या परीक्षांच्या निकालाची चर्चा सुरू झाली आहे. त्यातून समाजमाध्यमांमध्ये निकालाच्या तारखा फिरत असल्याने संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल २० मेनंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्य मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल कधी जाहीर केला जाणार याबाबत उत्सुकता आहे.

हेही वाचा…सीबीएसईकडून दहावी, बारावीच्या निकालाबाबत महत्त्वाची अपडेट… निकाल कधी जाहीर होणार?

गेल्या वर्षी राज्य मंडळाने बारावीच्या परीक्षेचा निकाल २५ मे रोजी, तर दहावीच्या परीक्षेचा निकाल २ जून रोजी जाहीर केला होता. मात्र यंदा गेल्यावर्षीपेक्षाही लवकर निकाल जाहीर करण्याची तयारी असल्याची माहिती राज्य मंडळाकडून देण्यात आली. त्यामुळे दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी, त्यांच्या पालकांना पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक ती तयारी करण्यास वेळ मिळणार आहे.

हेही वाचा…‘एमआयएम’ची पुण्यातील ताकद दिसणार; ७ मे रोजी असदुद्दीन ओवेसी घेणार सभा

राज्य मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात, तर दहावीचा निकाल मे अखेरीस जाहीर करण्याचे नियोजन आहे. यंदा निकाल गेल्यावर्षीपेक्षा लवकर जाहीर करण्याचा प्रयत्न आहे. – शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य मंडळ