Gautami Patil Car Accident: नृत्यांगना गौतमी पाटील सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे. तिच्या कारने ३० सप्टेंबर २०२५ रोजी वडगाव बुद्रुक येथे एका रिक्षा चालकाला जोरात धडक दिल्याची घटना घडली होती. या घटनेत सदर रिक्षा चालक जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, असे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले. अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढलेल्या गौतमी पाटीलच्या चालकाला काही तासातच अटक करण्यात आली. दरम्यान अपघात झाला त्या ठिकाणीचे सीसीटीव्ही चित्रण प्रसिद्ध करावे आणि गौतमी पाटीलला अटक करावी, या मागणीसाठी अपघातग्रस्त रिक्षाचालकाचे कुटुंबिय आणि शिवसेनेच्या (ठाकरे) वतीने सिहंगड पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करण्यात आले.
गौतमी पाटीलला उचलणार की नाही?
दरम्यान या आंदोलनानंतर रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी भाजपाचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले असता पाटील यांनी थेट पोलीस उपायुक्तांना फोन केला. फोन केल्यानंतर ‘गौतमी पाटीलला उचलणार की नाही?’ असा प्रश्न त्यांनी विचारला. अपघातग्रस्त कुटुंबाचा वैद्यकीय खर्च वाढला असून त्याबद्दल लवकर न्याय करावा, असे निर्देश त्यांनी दिले.
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या या संवादाचा व्हिडीओ खाली पाहू शकता..
गौतमी पाटील विरोधात आंदोलन करणाऱ्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, गौतमी पाटील अपघातावेळी गाडीत जरी नसली तरी तिची जबाबदारी संपत नाही. तिच्या नावावर गाडी असल्यामुळे ती सुद्धा आरोपीच आहे. तर रिक्षाचालकाच्या मुलीने सांगितले की, गौतमी पाटील अपघातावेळी गाडीत होती की नाही? याचा कोणताही पुरावा अद्याप समोर आलेला नाही. आता सुरू असलेले प्रकरण प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीवर सुरू आहे. याव्यतिरिक्त पोलिसांनी सीसीटीव्ही किंवा इतर पुरावे सादर केलेले नाहीत.
आंदोलकांनी आरोप केला की, पोलीस रिक्षाचालकाच्या कुटुंबाला सहकार्य करत नाहीत. ३० सप्टेंबरला गौतमी पाटीलला नोटीस दिल्याचे सांगितले. मात्र अद्यापही त्या पोलीस ठाण्यात आलेल्या नाहीत. उलट त्या राज्यभर शो करत फिरत आहेत. जखमी रिक्षाचालकाचा रुग्णालयाचा खर्च लाखोंच्या घरात आहे. हा खर्च कुणी द्यायचा?
पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करणाऱ्या रिक्षाचालकाच्या मुलीने टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, आम्ही आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी आमच्याशी संवाद साधला. त्यावर आमचे समाधान झाले असले तरी जोपर्यंत सीसीटीव्ही फुटेज समोर येत नाही तोपर्यंत आमचे समाधान होणार आहे. आतापर्यंत जे फुटेज समोर आले, त्यात गाडी चालविणाऱ्याचा चेहरा दिसून येत नाही.
गौतमी पाटीलकडून आम्हाला संपर्क नाही
अपघात झाल्यापासून आतापर्यंत गौतमी पाटीलच्या वतीने आमच्या कुटुंबाशी साधा संपर्कही केलेला नाही, असेही अपघातग्रस्त रिक्षाचालकाच्या मुलीने वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. तसेच अपघातस्थळावरून गाडी कुणी टो केली? ती कुठे नेली? याचाही तपास पोलीस करत असून त्याबद्दल आम्हाला माहिती देण्याचे आश्वासन पोलिसांनी दिली.