पुणे : ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानबरोबरच भारताचेही नुकसान झाले आहे. या नुकसानीचे मूल्यमापन सुरू आहे. लवकरच लष्कराकडून याबाबत लवकरच माहिती जाहीर केली जाईल,’ असे सरसेनाध्यक्ष (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी मंगळवारी दिली. ‘युद्धात हानी झाली, तरी तुम्हाला लष्कराचे मनोधैर्य कायम ठेवावे लागते. त्यामुळे युद्धातील हानीपेक्षा अंतिम परिणाम काय झाला हे महत्त्वाचे ठरते,’असेही त्यांनी स्पष्ट केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित ‘भविष्यातील युद्धे आणि युद्धनीती’ या विषयावरील विशेष व्याख्यानात जनरल चौहान बोलत होते.
‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारताची काही लढाऊ विमाने पाकिस्तानने पाडल्याची कबुली जनरल चौहान यांनी नुकतीच दिली होती. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, ‘पाकिस्तानने सुरुवातीला ४८ तास हल्ला करण्याचे नियोजन केले होते. परंतु, आठ तासांतच त्यांना हल्ला गुंडाळावा लागला. त्यांनीच प्रथम दूरध्वनी करून चर्चेची तयारी दर्शविली. भारतीय हवाई हल्ल्यांमुळे मोठे नुकसान झाल्यामुळेच पाकिस्तानने नरमाईची भूमिका घेतली. पाकिस्तानने स्वत:हूनच भारतामुळे झालेल्या हानीची कबुली दिली. मात्र, पाकिस्तानच्या हल्ल्यामुळे भारताची झालेली नेमकी हानी त्यांना कळू शकली नाही. या युद्धात झालेल्या आपल्या हानीचे मूल्यमापन सुरू आहे. लवकरच याबाबत माहिती जाहीर केली जाईल.’
जनरल चौहान यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि बदललेली युद्धनीती यावरही भाष्य केले. ‘‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये दोन्ही देशांदरम्यान थेट संपर्काविना युद्ध झाले. त्यात हवाई हल्ले करण्यात आले. केवळ नियंत्रण रेषेवेरील हल्ले आणि प्रतिहल्ले यांचा अपवाद मानावा लागेल. या युद्धात हवाई दलाने अधिक अचूकपणे हल्ले करून शत्रूचे जास्तीत जास्त नुकसान केले. या युद्धात ड्रोनचाही वापर झाला. या युद्धाच्या निमित्ताने आपण मनुष्य विरुद्ध यंत्र या टप्प्यावर पोहोचल्याचे निदर्शनास आले आहे. भविष्यात दोन देशांमधील युद्ध हे प्रामुख्याने यंत्र विरुद्ध यंत्र असेल,’ असे त्यांनी नमूद केले.
‘पाकिस्तानी सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मानसिकता ही नेहमी भारताला हजार ठिकाणी जखमा करण्याची आहे. मात्र, या वेळी कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद आणि त्याला आसरा देणे खपवून घेतले जाणार नाही, अशी ठाम भूमिका भारताने घेतली. युद्ध आणि राजकारण या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सुरू असतात. त्यातून आपल्याला योग्य गोष्टी साध्य करावयाच्या असतात. पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला योग्य प्रत्युत्तर दिले. भारत हा अण्वस्त्रांची धमकी देण्याच्या पाकिस्तानच्या रणनीतीला घाबरत नसल्याचेही या निमित्ताने दाखूवन देण्यात आले,’ असेही चौहान यांनी स्पष्ट केले.
या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. चारुशीला गायके, संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे उपस्थित होते.
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे भारताने पाकिस्तानबरोबर एक नवीन रेषा आखली आहे. आपण दहशतवादाला पाण्याशी जोडून लष्करी कारवाईचे पाऊल उचलले. दहशतवादाविरोधातील लढाईत ही बाब यापुढे अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.- जनरल अनिल चौहान, सरसेनाध्यक्ष