Vaishnavi Hagawane Suicide Case Court Updates : पुण्याच्या मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची देशभर चर्चा चालू आहे. ही आत्महत्या नसून हुंडाबळी असल्याचा आरोप वैष्णवीच्या पालकांकडून केला जात आहे. या प्रकरणावर नुकतीच पुणे न्यायालयात सुनावणी पार पडली असून न्यायालयाने वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे या दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी, तर वैष्णवीचा नवरा शशांक, नणंद करीश्मा व सासू लता हगवणे या तीन आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायालयीन कार्यवाही पार पडल्यानंतर हगवणे कुटुंबाचे वकील विपुल दुषण यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी थेट वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला.
विपुल दुषण यांनी हा हुंडाबळी असल्याचे दावे फेटाळले आहेत. तसेच ते म्हणाले, “वैष्णवीचा सासरी छळ होत नव्हता. तिच्याबरोबर जे काही घडलं त्यास कौटुंबिक छळ म्हणता येणार नाही. पतीने पत्नीला किरकोळ स्वरुपाची मारहाण केली तर त्याला कौटुंबिक हिंसाचार म्हणता येत नाही, तो छळ नसतो. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला होता जो आम्ही पुणे न्यायालयाला दिला आहे”.
दरम्यान, हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ केला जात होता या आरोपांवर प्रतिक्रिया देताना हगवणे कुटुंबाचे वकील म्हणाले, “वैष्णवीचं २०२३ मध्ये लग्न झालं. त्यानंतर तिच्या पालकांनी तिच्या नावावरील संपत्ती एका खासगी बांधकाम व्यावसायिकाला विकली. तेव्हा आम्ही (हगवणे कुटुंब) तिला तिच्या माहेरी नेऊन सोडलं होतं. जेणेकरून ती तिच्या पालकांना ना हरकत प्रमाणपत्र देऊ शकेल. ज्या कुटुंबाला हुंडा हवा असेल ते कुटुंब अशा प्रकारे आपल्या सुनेला ना हरकत प्रमाणपत्र द्यायला लावेल का?”
“हुंडाबळी प्रकरणाला वेगळं वळण देण्यासाठी हगवणेंकडून वैष्णवीचं चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न”
हगवणे कुटुंबाच्या वकिलाने दावा केला आहे की “आम्ही (हगवणे कुटुंब) वेळोवेळी वैष्णवीच्या पालकांना जाणीव करून दिली होती की तिच्या मोबाइलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी व चॅट सापडले आहेत. त्यामुळे वैष्णवीच्या पालकांनी तिचा फोन काढून घेतला. योग्य वेळी आम्ही ते चॅट्स न्यायालयासमोर ठेवू. दरम्यान, वैष्णवीचे काका मोहन कस्पटे यांनी हगवणेंच्या वकिलांनी केलेल्या दाव्यांवर संताप व्यक्त केला आहे. हगवणे कुटुंब आता वैष्णवीचं चारित्र्यहनन करत असल्याचं मोहन कस्पटे यांनी म्हटलं आहे.
मोहन कस्पटे म्हणाले, “हुंडाबळी प्रकरणाला वेगळं वळण देण्यासाठी हगवणेंच्या वकिलाकडून वैष्णवीचं चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांना दुसरी बाजू दिसत नाही म्हणून तिचं चारित्र्यहनन करत आहेत. त्या दोघांचा प्रेमविवाह होता, मग पत्नीवर संशय घेण्याचं कारण काय? तुमचा तिच्यावर विश्वास नव्हता तर मग लग्न का केलं? याचा अर्थ तुम्ही वैष्णवीच्या वडिलांकडे असलेले पैसे पाहून लग्न केलंत. आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे”.
हगवणेंच्या वकिलांकडून निलेश चव्हाणचा बचाव
विपुल दुषण म्हणाले, “निलेश चव्हाणवर पूर्णपणे अन्याय झाला आहे. निलेश हा शशांक हगवणेचा मित्र आहे. इतक्या वाईट परिस्थितीत त्याने त्याची मैत्री निभावली. हगवणे कुटुंबातील पाच जण तुरुंगात होते तेव्हा वैष्णवीचं बाळ कोण सांभाळणार होतं? वैष्णवीच्या अंत्यविधीनंतर कस्पटे कुटुंबाने बाळ नेलं नाही. तेव्हा तिचं बाळ कोण सांभाळणार होतं? परिणामी हगवणे कुटुंबाने विनंती केल्यामुळे निलेशने वैष्णवीचं बाळ सांभाळलं. मात्र, आता त्याच्यावर अन्याय होत आहे”.