बारामती : पाणी देण्यासाठी मी जर कोणाला धमकावले असते तर जनतेने मला इतक्या मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिलाच नसता, असे स्पष्ट करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले. संस्था चालविताना संस्थेच्या पद्धतीने चालवायची असते आणि राजकारण हे राजकारणाच्याच पद्धतीने करायचे असते. जर कोणी धमकावलेच असेल तर पोलिसांत तक्रार दाखल करावी, पोलीस त्या बाबतची कार्यवाही करतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

सुपे येथे शरद पवार यांनी अजित पवार यांचा नामोल्लेख टाळून दमबाजीला घाबरु नका असे जाहीर सभेतून सांगितले होते. त्या बाबत विचारता अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. गुढीपाडव्याच्या निमित्ताने भेटीगाठी घेण्यासाठी ते बारामतीमध्ये आले होते. विजय शिवतारे यांच्या मागण्यांबाबत त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या समोर काही भूमिका मांडली होती. त्याच वेळेस त्यांच्या भागात त्यांच्या कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेण्याची इच्छा त्यांनी प्रदर्शित केली होती. त्यानुसार ११ एप्रिल रोजी होणाऱ्या त्यांच्या मेळाव्यास उपस्थित राहणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

हेही वाचा : आकर्षक क्रमांकासाठी पुणेकरांचा होऊ दे लाखोंचा खर्च! जाणून घ्या सर्वांत महागडे क्रमांक…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकांना पटेल असे बोलावे

शिवसेना नेते संजय राऊत यांनी लोकसभेची लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे आहे, असे म्हटले आहे. त्याकडे लक्ष वेधले असता ‘तुम्हाला तरी खरंच असं वाटतं का?’, असा मिश्कीलपणे प्रतिप्रश्न अजित पवार यांनी विचारला. एक वेळ नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी ही लढाई आहे असे ते म्हणाले असते तर ते मान्य करता आले असते. पण, त्यांचा पक्ष महाराष्ट्राबाहेर नाही. त्यामुळे असे होणार नाही, असे स्पष्ट करून लोकांना पटेल असे तरी त्यांनी बोलावे असा सल्लाही अजित पवार यांनी संजय राऊत यांना दिला.