पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात यंदाच्या हंगामातील विक्रमी पाऊस पडला. त्यामुळे खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले असून या धरणातून मुठा नदीत सोमवारी रात्री ११.३० पासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आज सकाळी १० वाजल्यापासून खडकवासला धरणातून नदीपात्रात ३४२४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीपात्राच्या परिसरातील नागरिकांवर सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. धरणांमधील पाणीसाठा १०.७९ अब्ज घनफूट (टीएमसी) ३७.०१ टक्क्यांवर पोहोचला आहे. चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी रात्रीपासून मंगळवारी सकाळपर्यंत जोरदार पावसाने हजेरी लावली. सोमवारी रात्रीपासून मंगळवारी सकाळपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात १७० मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात १३७ मि.मी, पानशेत धरण परिसरात १४१ मि.मी, तर खडकवासला धरण क्षेत्रात ६० मि.मी पावसाची नोंद झाली आहे. सध्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात १०.७९ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ३७.०१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. सोमवारी रात्री चारही धरणांत ९.४७ टीएमसी पाणीसाठा होता. सोमवारी रात्रीच्या तुलनेत मंगळवारी सकाळी तब्बल १.३२ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. प्रमुख धरणांमधील पाणीसाठा टीएमसी, टक्क्यांतटेमघर ०.६८ १८.२९वरसगाव ४.३० ३३.५८पानशेत ३.८१ ३५.८२खडकवासला १.८६ ९४.०८एकूण १०.७९ ३७.०१