MSBSHSE Maharashtra SSC 10th Board Result Passing Percentage Latur महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा दहावीचा निकाल ९५.८१ टक्के लागला आहे. यंदा राज्यातील १८७ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. लातूर विभागातील सर्वाधिक १२३ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, सहसचिव माणिक बांगर या वेळी उपस्थित होते. यंदा दहावीच्या परीक्षेला विद्यार्थी नोंदणी वाढली होती. नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली. एकूण १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. कोकण विभागाने निकालाने बाजी मारली असून, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९९.०१ टक्के लागला. तर नागपूर विभागाचा निकाल सर्वांत कमी ९४.७३ टक्के लागला. निकालात मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे. ९४.५६ टक्के मुले उत्तीर्ण झाली असून, ९७ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. गेल्यावर्षी ९३.८३ टक्के निकाल लागला होता. त्यामुळे यंदा निकाल वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा : दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी १.९८ टक्के निकाल वाढला

गेल्यावर्षी राज्यातील १०८ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले होते. यंदा ८१ हजार ९९१ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. ५ लाख ५८ हजार २१ विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. शंभर टक्के गुण मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सवलतीच्या गुणांचा लाभ मिळाला आहे, अशी माहिती राज्य मंडळाने दिली. पुणे विभागातील १०, नागपूर विभागातील १, छत्रपती संभाजीनगर विभागातील ३२, मुंबई विभागातील ८, कोल्हापूर विभागातील ३ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले. तर लातूर मधील १२३ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले.