पुणे : प्रकाश आंबेडकर असो किंवा इतर कुणी असो, दंगलीविषयी बोलत असतील तर त्यांनी पोलिसांना माहिती द्यावी, असे भाजप नेते नारायण राणे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हटले आहे. “पोलीसांनी त्यांची दखल घ्यायला हवी. त्यांची चौकशी करायला हवी. दंगलीची त्यांच्याकडे काय माहिती आहे. ती पोलिसांनी घेऊन दंगल रोखण्यासाठी कारवाई करावी, अशा घटनांची माहिती कोणीही लपवून ठेवू नये. प्रकाश आंबेडकर यांच्यावर एफ आय आर दाखल करून त्यांना अटक व्हायला पाहिजे. तसेच त्यांना अटक करून दंगलीचा आधार काय आहे. याबाबतची माहिती घ्यायला पाहिजे.”, असे राणे यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षण व मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल प्रश्न विचारताच नारायण राणे म्हणाले, “कोण जरांगे पाटील ? मी त्यांना ओळखत नाही. जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा अभ्यास करावा, ते अजून वयाने लहान आहेत. मराठा समाज ओबीसीतून आरक्षण घेणार नाही.”
हेही वाचा : नवले पूल परिसरात पुन्हा अपघात; टेम्पो उलटून एकाचा मृत्यू
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राणे यांच्या मुलांवर टीका केली होती. त्यावर बोलताना राणे म्हणाले, “ते नाव घेऊ नका, त्यावर प्रश्न विचारू नका. संजय राऊतांकडे आक्रमकता आहे का ? ते दुसरे कधी चांगले काय बोलतात? मी वाट पाहतोय शिंदे सरकार त्यांचं संरक्षण कधी काढणार, संजय राऊत हे आदित्य ठाकरेंबरोबर आत जाणार आहेत. सध्या जामिनावर बाहेर आहेत. आदित्य ठाकरे सुशांत सिंह केसमध्ये आतमध्ये जाणार, तिथं संजय राऊत देखील सोबत करायला आत असतील.”
हेही वाचा : पुण्यातील मजूर गेले कुठे ? प्रशासन पडले बुचकाळ्यात
तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना १५ लाख रुपये अद्याप खात्यात जमा झाले नाहीत, असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर उत्तर देताना ते म्हणाले ‘आम्ही अनेक स्किम दिल्या आहेत.’ राणे यांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंवरही टीका केली. “बांधावर जाऊन काय पैसे वाटणार आहे का ? मातोश्रीवर फक्त इनकमिंग आहे. त्यांना आउट गोइंग माहिती नाही. उद्धव ठाकरे यांच्याकडे आक्रमक व्हायला कोणी आहे का ? आक्रमकवाले सगळे दुसरीकडे गेले. उद्धव ठाकरे गटात आहे कोण? तो गट तरी आहे का ?”, अशी टीका राणे यांनी केली आहे.