पुणे : इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीत शहरातील नामांकित महाविद्यालयांच्या पात्रता गुणांचा टक्का चढा असल्याचे दिसून आले आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांसाठीचे पात्रता गुण ९० टक्क्यांहून अधिक असून, पहिल्या फेरीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना आजपासून (३० जून) प्रवेश निश्चित करता येणार आहे.
राज्य मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची प्रतीक्षा होती. मात्र, यंदा राज्यभरात पहिल्यांदाच ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. या प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी उद्भवल्याने पहिल्या फेरीची निवडयादी जाहीर करण्यास विलंब झाला. मात्र, बराच काळ प्रतीक्षा केल्यानंतर अखेर शनिवारी (२८ जून) पहिल्या फेरीची निवडयादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार नामांकित महाविद्यालयातील प्रवेशासाठीच्या चुरशीमुळे पहिल्या फेरीसाठीचे पात्रता गुण चढे असल्याचे दिसून येत आहे.
विज्ञान शाखेसाठी फर्ग्युसन महाविद्यालयात खुल्या प्रवर्गासाठी अनुदानित तुकडीसाठी ९५.९ टक्के, स्वयंअर्थसहाय्यित तुकडीसाठी ९५.४ टक्के गुण आवश्यक आहेत. लक्ष्मणराव आपटे कनिष्ठ महाविद्यालयात ९५.२ टक्के, तर महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयात ९५ टक्के गुण आवश्यक आहेत. तर, कला शाखेत फर्ग्युसन महाविद्यालयात खुल्या प्रवर्गासाठी अनुदानित तुकडीसाठी ९६.४ टक्के, स्वयंअर्थसहाय्यित तुकडीसाठी ९४ टक्के असणे गरजेचे आहे. स. प. महाविद्यालयात ९२.६ टक्के, तर सिम्बायोसिस कला आणि वाणिज्य महाविद्यालयात ९२ टक्के पात्रता गुण आहेत. वाणिज्य शाखेसाठी ब्रृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात खुल्या प्रवर्गासाठी अनुदानित तुकडीसाठी ९६.२ टक्के, स्वयंअर्थसहाय्यित तुकडीसाठी ९५.८ टक्के, सिम्बायोसिस कला आणि वाणिज्य महाविद्यालयात ९४ टक्के, गरवारे वाणिज्य महाविद्यालयात ९३.६ टक्के गुण आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यंदा दहावीच्या निकालात घट झाली असली, तरी पात्रता गुणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत एक ते दीड टक्का वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवेशासाठी चुरस असल्याचे दिसून येते. पात्रता गुण वाढण्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. – डॉ. डी. डी. कुंभार, उपप्राचार्य, फर्ग्युसन महाविद्यालय