पुणे : प्राप्तिकर विभागाच्या देशभरातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. मुख्य प्राप्तिकर आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. हे कर्मचारी आज (ता.१५) दुपारनंतर कामावर बहिष्कार टाकणार आहेत.

कार्यालयीन अधीक्षक भरतीचे नवीन नियम सध्या सेवेत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागू करू नयेत. सध्या सेवेतील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा कालावधी ३ वर्षांचा आहे. नवीन भरती नियमानुसार हा कालावधी पदोन्नतीचा कालावधी १० वर्षांवर जाणार आहे. याला कर्मचारी संघटनांचा विरोध आहे. यामुळे देशभरात प्राप्तिकर विभागाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे.

हेही वाचा…आमदाराचे पत्र आणा, ससूनचे अधीक्षक बना! राष्ट्रवादीच्या आमदाराच्या शिफारशीनुसार मंत्र्यांकडून नियुक्ती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुण्यातील मुख्य प्राप्तिकर आयुक्त कार्यालय आणि त्याअंतर्गत येणाऱ्या इतर कार्यालयातील मोठ्या संख्येने कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले. कर्मचाऱ्यांनी तीन दिवस कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. याचबरोबर निदर्शने करण्यात आली. कर्मचारी आज दुपारनंतर कामावर बहिष्कार टाकणार आहेत, अशी माहिती आयकर कर्मचारी महासंघाचे (पुणे प्रभाग) सरचिटणीस शरद मुऱ्हे यांनी दिली.