‘‘भारत आणि अफगाणिस्तानात सारखीच परिस्थिती आहे. दोन्ही देशांना दहशतवादाशी सामना करायचा असल्याने त्यांनी एकमेकांना सहकार्य करण्याचे धोरण ठेवणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने भारतीय सैन्याने अफगाणिस्तानला शस्त्रदल सुसज्ज करण्यासाठी मदत करावी अशी अपेक्षा आहे,’’ असे मत अफगाणिस्तानचे राजदूत शाहिद अब्दाली यांनी शनिवारी व्यक्त केले.
पुणे आंतरराष्ट्रीय केंद्राने आयोजित केलेल्या ‘अफगाणिस्तान द्विपक्षीय संबंधांची पुढील दिशा’ या विषयावर अब्दाली बोलत होते. या वेळी पुणे आंतरराष्ट्रीय केंद्राचे अध्यक्ष दिलीप पाडगावकर, उपाध्यक्ष विजय केळकर, संचालक प्रशांत गिरबाने उपस्थित होते.
या वेळी अब्दली म्हणाले, ‘‘अफगाणिस्तान हा शांततेच्या मार्गाने जाऊ इच्छिणारा देश आहे. सध्या तालिबानी गटांशी चर्चा सुरू असून अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्यादृष्टीने पावले उचलली जात आहेत. हिंसेचा मार्ग सोडून अफगाणिस्तानची राज्यघटना मान्य करावी, असा आमचा आग्रह आहे. पाकिस्तानशी सध्या चांगले संबंध नसले, तरी भविष्यात ते सुधारण्याची आशा आहे.’’
भारत आणि अफगाणिस्तानमधील संबंधांबद्दल बोलताना अब्दाली म्हणाले, ‘‘अफगाणिस्तानमध्ये गुंतवणुकीच्या मोठय़ा प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. ऊर्जा, वाहतूक, शेती, आरोग्य, बांधकाम या क्षेत्रांमध्ये मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक करता येऊ शकते. अफगाणिस्तान सरकार, भारत आणि येथील उद्योजकांशी सहकार्य करण्यास उत्सुक असून त्याची सुरूवात चित्रपट आणि आरोग्य क्षेत्रातील गुंतवणुकीने करता येऊ शकेल. या सहकार्यासाठी लवकरच समिती स्थापन करण्यात येईल. अफगाणिस्तानच्या संसदेच्या पुनर्बाधणी व पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठीही भारताने मोठी मदत केली आहे. भारताच्या सहकार्यामुळे मोठय़ा प्रमाणावर रस्ते बांधणी करणे शक्य झाले असून त्यामुळे अफगाणिस्तानमधील अंतर्भाग जोडले गेले आहेत.’’