अपंग बालकांकडे समान संधी आणि मानवी अधिकाराच्या दृष्टिकोनातून पाहण्यासाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये ९ डिसेंबरपर्यंत समता सप्ताह राबवला जाणार आहे. मात्र त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नसून, लोकसहभागातून कार्यक्रम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हेही वाचा- पुणे: भटके-विमुक्त जाती-जमातींचे ११ डिसेंबरला राज्यस्तरीय अधिवेशन
अपंग विद्यार्थ्यांबरोबर भेदाभेद होऊ नये, पालकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ नये, सर्वसामान्यांप्रमाणे जीवनशैली जगण्याबाबतच्या प्रचार-प्रसारासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये समता सप्ताह राबवण्यात येणार आहे. विशेष गरजा असणारी मुले, पालकांशी संवाद, चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धात्मक कार्यक्रम, अपंग गुणवंत विद्यार्थ्यांच्या मुलाखती असे कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, या सप्ताहासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने निधी उपलब्ध करून दिलेला नाही. तसेच लोकसहभागातून वर्गणी गोळा करून, दानशूर व्यक्तींचा सहभाग नोंदवून प्रभावीपणे उपक्रम राबवण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सप्ताह साजरा झाल्यानंतर १० डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र, निधी उपलब्ध करून दिलेला नसताना केवळ लोकसहभाग आणि निधी संकलन करून सप्ताह राबवण्याबाबत शिक्षकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.