पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) प्रदेशाध्यक्षपदी सात वर्षांचा कालावधी मिळाला असल्याने नव्या चेहऱ्याला संधी मिळावी, यासाठी जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी जयंत पाटील यांनी पक्षाच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित मेळाव्यात मंगळवारी केली. मात्र, ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर नव्या चेहऱ्याला संधी देण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल,’ असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केल्याने पुढील काही महिने जयंत पाटील हेच प्रदेशाध्यक्षपदी कायम राहणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे राज्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला, त्या वेळी जयंत पाटील यांनी ही मागणी केली. ते म्हणाले, ‘आजपर्यंत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मला बरीच संधी दिली. प्रदेशाध्यक्ष म्हणून सात वर्षांचा कालावधी दिला. आता पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. त्यामुळे मला प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त करावे. याबाबत पवार साहेबांनी योग्य तो निर्णय घ्यावा.’
जयंत पाटील यांनी केलेल्या मागणीवर शरद पवार यांनी त्यांच्या भाषणातच उत्तर दिले. पवार म्हणाले, ‘जयंत पाटील यांनी दहा वर्षे राज्याचे अर्थमंत्री म्हणून काम केले. विरोधी पक्ष म्हणूनही त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. नवीन चेहऱ्यांना संधी देण्याच्या पाटील यांच्या मागणीनुसार प्रमुख सहकाऱ्यांशी चर्चा करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर निर्णय घेतला जाईल. प्रत्येक तालुका आणि जिल्हात नवी फळी तयार केली जाईल.’