राजकारण हे सामाजिक, आर्थिक परिवर्तन करण्याचे साधन असून ते स्वत:च्या आर्थिक उत्पन्नाचे साधन होऊ नये,’ अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केली. भारतीय छात्र संसदेचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
माईर्स एमआयटीने आयोजित केलेल्या सहाव्या भारतीय छात्र संसदेची सुरूवात बुधवारी झाली. या वेळी ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांना फडणवीस यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. या वेळी महापौर दत्तात्रेय धनकवडे, पालकमंत्री गिरीश बापट, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार चंदू बोर्डे, खासदार मीनाक्षी लेखी, ज्येष्ठ जाहिरात गुरू अॅलेक पदमसी, माजी केंद्रीय मंत्री शैलजा, समाजसेवक तुषार गांधी, एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, राहुल कराड आदी उपस्थित होते.
या वेळी फडणवीस म्हणाले, ‘लोकशाहीत सर्व प्रकारच्या विचारांना थारा आहे. या सर्व विचारांचा स्वीकार झाला पाहिजे. प्रत्येक विचार हा वेगळा असला, तरी सर्वाचा मार्ग देशाला विकासाकडे नेणारा असला पाहिजे. लोकशाहीत संवाद हे सर्वात मोठे माध्यम आहे. त्याचा प्रभावी वापर झाला पाहिजे. इतर देश वाध्र्यक्याकडे झुकलेले असताना त्यांना मनुष्यबळ पुरवण्याची क्षमता भारताकडे येत्या काळात असेल. मात्र लोकसंख्येला मनुष्यबळात परावर्तित करणे गरजेचे आहे. शाश्वत विकासाचा विचार केला पाहिजे.’
पुरस्काराला उत्तर देताना नय्यर म्हणाले, ‘आपल्याकडे हुकूमशाही कधीच येऊ शकणार नाही. आणीबाणीच्या काळात लोकशाहीवर बंधने आणण्याचा प्रयत्न झाला पण तो टिकला नाही. हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना भारतीय जनता वठणीवर आणते. मात्र त्यामुळे सर्वाना न्याय देणाऱ्या देशाची निर्मिती करण्याची आणि लोकशाही टिकवण्याची जबाबदारी तरूणांची आहे.’

भूमाता ब्रिगेडकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन
‘शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान ट्रस्ट शासनाने ताब्यात घ्यावा. शनी चौथऱ्यावर महिलांना प्रवेश द्यावा. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी चौथऱ्यावर सपत्नीक जाऊन दर्शन घ्यावे. देशभरात ज्या मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश नाही, तेथे त्यांना प्रवेश देण्यात यावा,’ अशा मागण्यांचे निवेदन भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी एमआयटीच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांना दिले.