पुणे : ‘‘धर्म-संस्कृती’चे राज्य पुन्हा आणण्यासाठी ‘हिंदी’ची गरज असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ‘हिंदुत्वा’च्या राजकारणासाठीच ‘हिंदी’ची सक्ती करण्यात येते आहे. त्यामुळे आधी ‘हिंदुत्वा’ला नकार द्यायला हवा,’ असे मत माजी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केले. काही पक्ष, नेते भाषिक राजकारणासाठी एकाच वेळी हिंदुत्वाचा स्वीकार आणि हिंदीला नकार देण्याची धूळफेक करीत असल्याची टीकाही त्यांनी केली.

‘साधना’ प्रकाशन आणि ‘आरोग्य सेने’च्या वतीने पाटील यांच्या हस्ते डॉ. अभिजित वैद्य यांच्या ‘पुरोगामी जनगर्जना’ मासिकातील निवडक संपादकीय लेखांचा समावेश असलेल्या ‘शब्दांचीच शस्त्रे’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अलाहाबाद विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन हर्षे, लेखक डॉ. अभिजित वैद्य, प्रकाशक विनोद शिरसाट, राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. राजा कांदळकर या वेळी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘वेदांचा अर्थ तो आम्हासीच ठावा, असे म्हणणारे तुकोबा आणि विवेकाची काजळी दूर करण्याची प्रार्थना करणारे ज्ञानोबा विषमतेच्या, अन्यायाच्या विरोधात नेहमीच उभे राहिले. संतानी खऱ्या अर्थाने समाजाला समतेचा विचार दिला. आता संतांचीच शिकवण घेऊन ‘मनुवादा’च्या आक्रमणाविरोधात ठामपणे उभे राहायला हवे. पुरोगामी जनगर्जना करण्यासाठी जागे होऊन सगळ्या संघटना, संस्थांनी एकत्र येऊन लढा उभारण्याची वेळ आली आहे.’

‘गुन्हेगार निवडणुकीच्या प्रचारासाठी बाहेर येतात. बलात्कारासारखे गंभीर आरोप असलेल्या लोकांच्या दर्शनासाठी रांगा लागतात. सध्या समाजच निर्लज्ज होत आहे, की काय, अशी भीती वाटत आहे. सगळ्या संस्था मोडकळीला आल्या आहेत. माणसे वेडी होत आहेत. अशा काळात निर्भय होणे अवघड असते,’ अशा शब्दांत डॉ. हर्षे यांनी चिंता व्यक्त केली. शिरसाट, वैद्य यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. प्रमोद दळवी यांनी सूत्रसंचालन केले. अतुल रुणवाल यांनी आभार मानले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अस्मितेचे राजकारण सध्या वाढलेले दिसते. दुसरा किंवा विरोधातला विचार झुंडशाहीकडून दाबला जातो आहे. त्यामुळे कोणतेही सामाजिक संशोधन करणे आता अशक्य झाले आहे. डॉ. राजन हर्षे, माजी कुलगुरू, अलाहाबाद विद्यापीठ