‘जिथे पाणी वापरण्याबाबतच्या विवेकाचा दुष्काळ आहे तिथेच दुष्काळ आहे,’असे मत राज्याच्या जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव डॉ. दि. मा. मोरे यांनी व्यक्त केले.
‘महाराष्ट्र विकास केंद्रा’तर्फे आयबीएन लोकमत वृत्तवाहिनीचे प्रमुख राजकीय वार्ताहर आशिष जाधव यांना माजी ग्रामविकास मंत्री प्रतापराव भोसले यांच्या हस्ते जलमित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी डॉ. मोरे बोलत होते. माढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अॅड. बाळासाहेब पाटील, महाराष्ट्र विकास केंद्राचे अध्यक्ष अनिल पाटील या वेळी उपस्थित होते.
मोरे म्हणाले, ‘‘उसाला नावे ठेवण्याचे कारण नाही. पण साखर कारखाने कुठे असावेत हा खरा प्रश्न आहे. कोणत्याही क्षेत्रात कुठे थांबावे याबाबतचे कोणतेही धोरण आपल्याकडे नाही. आर्य चाणक्याने कौटिल्याचे अर्थशास्त्र या ग्रंथात ‘पाणीसाठे निर्माण कर आणि इक्षुदंडाच्या (उसाच्या) क्षेत्रावर नियंत्रण ठेव’ असा सल्ला त्या काळी राजाला उद्देशून दिला होता. दुष्काळी भागात केलेल्या भटकंतीत १-२ एकराच्या मोसंबीच्या बागा जळालेल्या कुठे सापडल्या नाहीत. मात्र मोठय़ा बागा दुष्काळाने जळाल्याचे दिसून आले. तुकारामांनीही एके ठिकाणी ‘ज्याच्या दारात पाणी नाही त्याने फळबागा लावू नयेत’ असेच म्हटले होते. दुष्काळी भागातही टँकरची गरज न भासणारी अनेक गावे आहेत. जिथे पाणी वापरण्याच्या विवेकाचा दुष्काळ आहे तिथेच दुष्काळ आहे.’’
प्रतापराव भोसले म्हणाले, ‘‘केवळ सरकार आणि कायदे यामुळेच आपण मागे पडलो, हा विचार डोक्यातून काढून टाकण्याची गरज आहे. विषमता सर्व बाजूंनी आहे. त्याचा विचार मात्र एकांगी केला जातो. विषयांची खिचडी न करता प्रत्येक विषयाचा वेगवेगळा विचार करायला हवा. समाजात होणाऱ्या चांगल्या गोष्टीही जगासमोर येणे आवश्यक आहे.’’
आशिष जाधव म्हणाले, ‘‘राज्याचे पाणीविषयक धोरण आधीपासूनच चुकलेले आहे. तीन हजार अब्ज घन फूट पाणी आपण अडवू शकत नाही. काही दिवसांपूर्वीचे अजित पवार यांचे दुष्काळाबाबतचे वादग्रस्त वक्तव्य असभ्य असण्याबरोबरच सरकारची हतबलता दाखवणारे होते. सरकार ऊस ठिबक सिंचनावर घेण्यास अनुदान वाढवून देण्याच्या विचारात आहे. मात्र त्याचा फायदा केवळ पश्चिम महाराष्ट्रालाच होण्याची शक्यता आहे.’’
संग्रहित लेख, दिनांक 13th May 2013 रोजी प्रकाशित
दुष्काळ धोरणांचा आणि विवेकाचा – डॉ. दि. मा. मोरे
‘जिथे पाणी वापरण्याबाबतच्या विवेकाचा दुष्काळ आहे तिथेच दुष्काळ आहे,’असे मत राज्याच्या जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव डॉ. दि. मा. मोरे यांनी व्यक्त केले.
First published on: 13-05-2013 at 02:35 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lack of sobriety and planning cause of drought d m more