पुणे : घाऊक बाजारात भेंडी आणि घेवड्याच्या दरात वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.गुलटेकडीतील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेशातून हिरवी मिरची १५ टेम्पो, इंदूर येथून ६ टेम्पो गाजर, कर्नाटकातून ५ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून ३ ते ४ टेम्पो शेवगा, तामिळनाडूतून १०० प्लास्टिक जाळी (क्रेट्स) तोतापुरी कैरी, कर्नाटकातून ४ टेम्पो घेवडा, गुजरात, कर्नाटकातून मिळून ५ ते ६ टेम्पो भुईमूग शेंग, मध्य प्रदेशातून १० ते १२ टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

पुणे विभागातून ४०० ते ५०० गोणी सातारी आले, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, टोमॅटो ८ ते १० हजार पेटी, हिरवी मिरची १० ते १२ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, गाजर ४ ते ५ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, भुईमूग शेंग १०० गोणी, मटार ५०० ते ६०० गोणी, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा ९० ते १०० ट्रक अशी आवक झाली, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ५० ते ५५ टेम्पो अशी आवक झाली.

पालेभाज्यांचे दर स्थिर

नवरात्रोत्सवाचा प्रारंभ सोमवारपासून (२२ सप्टेंबर) होत आहे. नवारात्रोत्सवात अनेकजण उपवास करतात. उपवासामुळे पालेभाज्यांना मागणी कमी राहणार असून, पालेभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. गुलटेकडी मार्केटयार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबीर दीड लाख जुडी, तसेच मेथीच्या ३० हजार जुडींची आवक झाली होती. पालेभाज्यांचे दर (शेकडा जुडी) – कोथिंबीर – ८०० ते १५००, मेथी – १२०० ते २०००, शेपू – ८०० ते १०००, कांदापात – ८०० ते २०००, चाकवत – ४०० ते ७००, करडई- ३०० ते ७००, पुदीना – ५०० ते १०००, अंबाडी – ३०० ते ७००, मुळे – ८०० ते १५००, राजगिरा – ४०० ते ७००, चुका- ५०० ते ८००, चवळई – ३०० ते ७००, पालक – ८०० ते १५००

नवरात्रोत्सवानिमित्त फळांना मागणी

नवरात्राेत्सवानिमित्त फळांना मागमी वाढली आहे. मार्केट यार्डातील फळबाजारात फळांची आवक वाढली आहे. लिंबांच्या दरात गोणीमागे ५० ते ६० रुपये आणि सीताफळाच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली. अन्य फळांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. रविवारी फळबाजारात मोसंबी ८० ते ९० टन, संत्री २० ते २२ टन, डाळिंब १०० ते १२० टन, पपई ७ ते ८ टेम्पो, लिंबे एक हजार गोणी, कलिंगड ३ ते ४ टेम्पो , खरबूज २ ते ३ टेम्पो, चिकू एक हजार खोकी, पेरू ८०० ते ९०० प्लास्टिक जाळी, अननस ४ ट्रक, बोरे २५ ते ३० पोती, सफरचंद ७ ते ८ हजार पेटी, सीताफळ १५ ते २० टन अशी आवक झाली.