महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत अधिकारी झालेल्या अहमदनगरच्या दर्शना पवारच्या मृत्यूने खळबळ उडाली. तिचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या स्थितीत आढळला. यानंतर तिच्या शवविच्छेदन अहवालात धक्कादायक खुलासे झाले आहेत. यातून सुरुवातीला संशयास्पद वाटणारा हा मृत्यू आता हत्या असल्याचं स्पष्ट झालं. आता तिने स्पॉटलाईट अकॅडमीच्या सत्कार कार्यक्रमात केलेलं शेवटचं भाषण समोर आलं आहे. यात तिने अधिकारी झाल्यावर आपलं मत व्यक्त केलं होतं.

दर्शना पवार म्हणालेली, “मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्याची काही तरी स्टोरी असते. मात्र, ही स्टोरी ऐकण्यासाठी लोक तेव्हाच उत्सूक असतात जेव्हा ती यशोगाथा बनून येते. आपण शाळेत चांगलं यश मिळवतो, महाविद्यालयात चांगलं यश मिळवतो. आज अक्षरशः त्यांच्या मुलींना घेऊन येतात आणि त्यांना कशी तयारी करायची सांग असं म्हणतात. या यशात अनेक लोकांचा सहभाग असतो.”

“आपण अपयशी ठरतो त्याला केवळ आपल्या त्रुटी जबाबदार असतात”

“आपण जेव्हा अपयशी ठरतो तेव्हा त्याला केवळ आपल्या त्रुटी जबाबदार असतात. आपण अभ्यासात कमी पडलो असू, आपलं लक्ष विचलित झालं असेल. मात्र, आपण यशस्वी होतो तेव्हा त्यामागे खूप लोकांची मेहनत असते. त्याचं श्रेय आपण अनेकांना द्यायला हवं. त्या श्रेयावर त्यांचा अधिकार असतो,” असं दर्शना पवारने सांगितेलं.

हेही वाचा : MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी झाली, सत्काराला गेली अन्…; दर्शना पवारच्या शवविच्छेदन अहवालात धक्कादायक खुलासे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“हे करू शकत नाही हे मला माहितीच नाही”

“माझ्या घरात माझ्या आई वडिलांनी तू हे करू शकत नाही असं मला कधीच सांगितलं नाही. हे करू शकत नाही हे मला माहितीच नाही. त्यांचा फार विश्वास असायचा. मलाच वाटायचं की त्यांनी विश्वास थोडा कमी करायला हवा. तू ते होणारच आहे, अशीच त्यांची भूमिका असायची. पालकांची ही फार मोठी भूमिका आहे. ते सतत आपल्याला प्रोत्साहन देत असतात. यासाठी मी माझ्या आई-वडिलांचे, कुटुंबाचे, मित्रांचे आभार मानते,” असंही दर्शनाने या भाषणात नमूद केलेलं.