पुणे : इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत बहुप्रतिक्षित पहिल्या नियमित फेरीची निवड यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार ६ लाख ३२ हजार १९४ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून, ४ लाख ५७ हजार ८४१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना आता ३० जून ते ७ जुलै या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी या बाबतची माहिती दिली. संचालनालयाच्या वेळापत्रकानुसार पहिली निवडयादी २६ जून रोजी जाहीर करण्यात येणार होती. मात्र, त्या दिवशी तांत्रिक अडचणींमुळे यादी जाहीर होऊ शकली नाही. त्यामुळे सुधारित वेळापत्रक जाहीर करावे लागले होते. त्यानुसार ३० जूनला पहिली निवड यादी जाहीर केली जाणार होती.

दहावीचा निकाल जाहीर होऊन महिन्याभरानंतरही अकरावीची प्रवेश प्रक्रिया मार्गी लागत नसल्याने शिक्षण विभागावर टीका करण्यात आली होती. मात्र, संचालनालयाने शनिवारीच शाखानिहाय प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर केली.

पहिल्या निवडयादीमध्ये विज्ञान शाखेसाठी अर्ज केलेल्या ६ लाख ९ हजार ७१८ विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ४२ हजार ८०१, वाणिज्य शाखेसाठी अर्ज केलेल्या २ लाख २३ हजार ९३१ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ३९ हजार ६०२, तर कला शाखेसाठी अर्ज केलेल्या २ लाख ३१ हजार ३५६ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ३९ हजार ७९१ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयासाठी नोंदवलेल्या प्राधान्यक्रमानुसार निवडयादीतील निम्म्यांहून अधिक विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. ४ लाख ५७ हजार ८४१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. तर ७७ हजार ९९ विद्यार्थ्यांना दुसऱ्या, ३६ हजार ९०१ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक असून, प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील कॅप फेरीसाठी प्रतिबंधित केले जाणार असल्याचे डॉ. पालकर यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवेश प्रक्रिया दृष्टिक्षेपात…

राज्यातील ९ हजार ४३५ शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांतील २१ लाख २३ हजार ७२० जागांसाठी १२ लाख ७१ हजार २०१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. केंद्रीभूत प्रवेशांसाठी (कॅप ) १६ लाख ६० हजार ८४, तर कोट्यासाठी ४ लाख ६३ हजार ६३६ जागा उपलब्ध आहेत. आतापर्यंत व्यवस्थापन, अल्पसंख्यांक आणि संस्थाअंतर्गत राखीव जागांअंतर्गत (कोटा) ६० हजार ४८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.