पुणे: आयुष्यात असलेल्या आव्हानांना जिद्दीने तोंड देऊन अनेक विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत यशाला गवसणी घातली. कष्टांना संयम आणि अभ्यासाची जोड देत विद्यार्थ्यांनी ध्येय साध्य करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.
कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत आणि स्वच्छ संस्थेच्या माध्यमातून शहरातील कचरा वेचकांच्या मुलांना मार्गदर्शन केले जाते. मातृ-पितृछत्र हरपलेल्या स्नेहा शिवाजी म्हसके या विद्यार्थिनीचा सांभाळ तिची आजी कांता म्हसके करतात. वयाची सत्तरी ओलांडलेल्या आजी ‘स्वच्छता दूत’ म्हणून दिवसभर कचरा वेचक म्हणून काम करतात. स्नेहाने ८१ टक्के गुण मिळवून आजीच्या कष्टाचे चीज केले. बिस्मिल्ला मुल्लाचे वडील दावल मुल्ला स्वच्छ संस्थेचे सदस्य आहेत. बिस्मिल्लाने ८२ टक्के गुण मिळवले आहेत.
शिक्षिका होण्याचं स्वप्न असलेल्या बिस्मिल्लाला भविष्यात काही गरजू मुलांना मोफत शिकवण्याची इच्छा आहे. तसेच, फर्ग्युसन महाविद्यालयातून कला शाखेतून पुढील शिक्षण घेण्याचा मानस आहे. कचरा वेचक म्हणून काम करणाऱ्या प्रिया बनसोडे यांची मुलगी मनुष्का हिने ८०.४ टक्के गुण मिळवले. तिला वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे आहे. तर, कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतच्या सभासद असलेल्या शाकू नाईकवडे यांचा नातू चेतन यानेही दहावीच्या परीक्षेत यश मिळवले. करोना काळात वडिलांचे निधन झाल्यानंतर त्याची आजी त्याचा सांभाळ करत आहे. पोलीस होण्याचे चेतनचे स्वप्न आहे.
सरस्वती मंदिर शिक्षण संस्थेच्या पूना नाईट हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा दहावीचा निकाल ८९.४७ टक्के लागला. शाहीद मुबारक पठाण या विद्यार्थ्याने ६७.२० टक्के गुणांसह प्रथम, रोहन दीपक शिंदे याने ५९ टक्के गुणांसह द्वितीय, ताई सपकाळे यांनी ५८.२० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला. सीमा रामा ओव्हाळ यांनीही ५५.८० टक्के गुण प्राप्त केले. या विद्यार्थ्यांचा सत्कार प्राचार्य सतीश वाघमारे, वर्गशिक्षक महेश पिसाळ, लेखनिक केदार शिंदे, अनिल राक्षे आणि शाळा समितीचे अध्यक्ष अविनाश नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
तंत्रज्ञानामध्ये विशेष रस असलेल्या शाहीद पठाण दिवसभर युट्यूबवर चित्रफिती तयार करून रात्री शाळेत जाऊन अभ्यास करायचा. आता शाळेत पहिला क्रमांक मिळाल्याचा त्याला आनंद झाला असून, पुढे जाऊन आणखी शिकण्याची त्याची इच्छा आहे. सीमा ओव्हाळ यांनी २५ वर्षांनंतर दहावीत प्रवेश घेतला. त्यांचे पती एसटीमध्ये चालक म्हणून काम करतात. त्या म्हणाल्या, मी एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करते. त्याचबरोबर मुलांचे शिक्षणही सुरू आहे. रात्रशाळेमुळे मला पुन्हा शिक्षण घेता आले. मुलगा अकरावीत असताना त्यांनी दहावीची परीक्षा दिली. आता पुढे बारावी पूर्ण करून परिचारिका अभ्यासक्रम करण्याचा मनोदय आहे.
करोना काळात पतीचे निधन झाल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी पेलत, भाजीचा व्यवसाय, कचरा वेचण्याचे काम करत ताई सपताळे यांनी मुलांचे शिक्षण केले. स्वतः शिकण्याची गरज लक्षात येताच रात्र शाळेत प्रवेश घेऊन दहावीच्या परीक्षेत यश मिळवले. आता पुढे आणखी शिकायचे असल्याचे सपताळे यांनी सांगितले. तर, रोहन शिंदे दिवसभर भंगाराचे काम करतो. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची आर्थिक जबाबदारी आल्याने तो कामाकडे वळला. त्यातून त्याने बहिणीचे लग्न, भावाच्या शिक्षणाची जबाबदारी निभावली.
मात्र, त्याच्या शिक्षणात पाच वर्षांचा खंड पडला. सध्या एका कार्यालयात सफाईचे काम करत असलेल्या रोहनने स्वतःच्या शिक्षणासाठी रात्रशाळेत प्रवेश घेतला. रोहन म्हणाला, जिद्दीने अभ्यास करून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालो. आता पुढे पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.टिंगरेनगरमधील स्व. सी. आर. रंगनाथन निवासी कर्णबधिर विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला. यंदा शाळेतील एकूण २४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यात अजित अण्णा पवार याने ८२.६० टक्के, स्नेहल खांडेकरने ८१.८० टक्के, समृद्धी पाटीलने ८०.८० टक्के गुण मिळवले.चौकट
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींचे यश
पुण्यातील भोई प्रतिष्ठानतर्फे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी पुण्यजागर शैक्षणिक प्रकल्प राबवण्यात आला. या प्रकल्पात दहा शेतकरी कुटुंब दत्तक घेण्यात आली. त्यात नांदेडमधील अर्धापूर तालुक्यातील नांदला येथील दुर्गा ज्ञानेश्वर क्षीरसागर हिने ८६.४० टक्के, तर मालेगाव येथील नियती प्रभाकर इंगोले हिने ७७ टक्के गुण मिळविले आहेत. ‘मी शिकून मोठे व्हावे, असे घरच्यांचे स्वप्न आहे. आईच्या आशीर्वादाने मी दहावीपर्यंतचा टप्पा पूर्ण करू शकले. ‘आयपीएस’ होण्यासाठी अभ्यास करणार आहे,’ असे दुर्गा म्हणाली. तर, शाळेतील शिक्षकांनी खूप चांगले मार्गदर्शन केले. आता विज्ञान शाखेतून बारावी पूर्ण करणार आहे. त्यानंतर पोलीस अधिकारी होण्याची इच्छा आहे, असे नियतीने सांगितले.