पुणे : ‘सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आरक्षणातील वर्गीकरण आणि नॉन क्रिमिलेयर संबंधीच्या निकालाशी बहुजन समाज पक्ष सहमत नाही. राज्य सरकारने त्यांच्या फायद्यासाठी जाती-जातींमध्ये ‘फूट पाडा आणि राज्य करा’ या धोरणाचा अवलंब करून आरक्षणातील वर्गीकरणाचा निर्णय लागू करण्यास सुरुवात केली आहे,’ असा आरोप बसपाच्या अध्यक्षा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी केला.

राज्याच्या विधानसभेत अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्याचा बसपाचा प्रयत्न असून, नागरिकांना न्याय देण्यासाठी प्रसंगी ‘बॅलन्सिंग पॉवर’ म्हणून सरकार बनवणाऱ्या पक्षाला समर्थन देण्याची भूमिका बसपची असेल, असेही त्यांनी जाहीर केले.

हेही वाचा…हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर यांचा मोठा निर्णय ! महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांंच्या अडचणी वाढल्या

बसपच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मायावती यांची पुण्यात येरवडा भागात जाहीर सभा झाली. वडगाव शेरी मतदारसंघाचे उमेदवार डॉ. हुलगेश चलवादी, राष्ट्रीय समन्वयक आकाश आनंद, राज्यसभा खासदार रामजी गौतम, महाराष्ट्राचे प्रभारी नर्मदाप्रसाद अहिरवार, प्रदेशाध्यक्ष सुनील डोंगरे, प्रदेश महासचिव काळुराम चौधरी, प्रदेश सचिव सुदीप गायकवाड, पुणे जिल्हा अध्यक्ष दिलीप कुसाळे व पुणे जिल्हा प्रभारी महंमद शफी उपस्थित होते.

मायावती म्हणाल्या, ‘दलित, आदिवासी, ओबीसींच्या उन्नतीसाठी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात कायदेशीर अधिकार दिले आहेत. मात्र, उपेक्षितांना दिलेल्या अधिकारांना विविध प्रकारे संपविण्याचा घाट सर्व पक्षांनी घातला आहे. हे प्रयत्न हाणून पाडण्याची आवश्यकता आहे. विधानसभेत संख्याबळ न मिळाल्यास मतदारांना न्याय देण्यासाठी सरकार बनविणाऱ्या पक्षाला बसप पाठिंबा देईल.

हेही वाचा…अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !

दुसऱ्या राजकीय पक्षाबरोबर युती करून निवडणूक लढविल्यास दलित, ओबीसी, अल्पसंख्याक समाजाची मते त्यांच्या उमेदवारांना मिळतात. मात्र, इतर पक्षातील मते बसपच्या उमेदवारांना मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बसपमुळे देशातील इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार आरक्षण मिळाले. तत्कालीन केंद्रातील काँग्रेस सरकारवर बसपने टाकलेल्या दबावामुळे हे शक्य झाले. परंतु, आतापर्यंत जातीयवादी पक्षांमुळे ओबीसींना संपूर्ण न्याय मिळालेला नाही. यासाठी बसपच्या उमेदवारांना विजयी करावे,’ असे आवाहन मायावतींनी मतदारांना केले.