लोकसभा निवडणुकीला अगदी काही दिवस शिल्लक राहिले असून महायुती आणि महाविकास आघाडीमधील जागा वाटप अद्यापपर्यंत पूर्णपणे झाले नाही. मात्र या दोन्ही आघाडींमधील प्रमुख नेत्यांमध्ये जागा वाटप करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामध्ये मित्र पक्षाच्या नाराजीलादेखील सामोरे जावे लागत आहे. त्याच दरम्यान महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडी होती. मात्र सन्मानजनक जागावाटप झाले नाही, त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तर दुसर्‍या बाजूला महायुतीमध्ये रामदास आठवले यांच्या पदाधिकाऱ्यांना सामावून घेतले जात नाही. आठवले गटाला जागा दिल्या नाही. याबाबत आज पुण्यात रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली राज्यभरातील कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपच्या एकूणच कार्यपद्धतीबाबत नाराजी बोलावून दाखवली. त्यानंतर रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या कार्यपद्धतीवर जाहीरपणे नाराजी व्यक्त करीत अनेक राजकीय घडामोडींबाबत भूमिका मांडली.

महाविकास आघाडीमधून प्रकाश आंबेडकर यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, भाजपची ‘बी’ टीम म्हणून त्यांच्यावर टीका होत आहे. त्या प्रश्नावर रामदास आठवले म्हणाले की, प्रकाश आंबेडकर जर ‘बी’ टीम असेल तर भाजपसोबत माझी ‘ए’ टीम आहे. ‘बी’ टीम वैगरे चर्चा होते. मतांची जर विभागणी होत असेल तर त्याची चर्चा होते. त्यामुळे प्रकाश आंबेडकर भाजपची ‘बी’ टीम अजिबात नाही. तर प्रकाश आंबेडकर हे वंचित आघाडीचे नेते असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांतून उमेदवारांची सुटका, आता एकाच परीक्षेतून प्रवेशाची संधी

हेही वाचा – मी उमेदवार आहे माझ्याशी भिडा; वडिलांवर कसली टीका करता ? प्रणिती शिंदेंचे राम सातपुतेंना आव्हान

हेही वाचा – महायुतीमध्ये आम्ही नाराज, पुढील तीन दिवसांत निर्णय घेऊ, रामदास आठवलेंचा इशारा

अकोला येथून प्रकाश आंबेडकर निवडणूक लढविणार आहेत. तर तुम्ही त्यांना पाठिंबा देणार का? त्या प्रश्नावर रामदास आठवले म्हणाले की, प्रकाश आंबेडकर हे अकोला येथून उभे राहणार आहेत. जर त्यांचाच आम्हाला सपोर्ट नाही, तर आमचा त्यांना सपोर्ट कसा असणार, असा सवाल उपस्थित करीत ते पुढे म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांना सपोर्ट करण्याचा काहीच संबध येत नाही. आम्ही महायुतीमध्ये आहोत, ते बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असून त्यांची अकोला तेथे ताकद आहे. पण त्यांचा (प्रकाश आंबेडकर) महाविकास आघाडीमध्ये अपमान झाला. ते अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या संपर्कात होते. महाविकास आघाडीमध्ये घेण्यात यावे, या करिता प्रकाश आंबेडकर यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले होते. मात्र वेळोवेळी त्यांना डावलण्यात आले आहे. तसेच त्यांच्या प्रस्तावाकडेदेखील दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आणि तो त्यांचा निर्णय योग्य आहे. त्यामुळे त्यांनी स्वबळावर लढावे, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.