पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची तयारी आणि पुणे मतदारसंघावर दावे-प्रतिदावे सुरू झाले असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही पुणे लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे नेते, पुणे लोकसभेचे निरीक्षक अमित ठाकरे यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी आढावा बैठक घेण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने बैठका आणि विभागनिहाय मेळावे घेण्यात येणार आहेत.

दरम्यान, मनसेकडून निवडणूक लढविण्यास अनेक इच्छुक आहेत. मात्र या बैठकीत संभाव्य नावांसंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. उमेदवारीचा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार आहेत, अशी माहिती मनसेकडून देण्यात आली.

हेही वाचा >>> ‘राष्ट्रवादी’ पक्ष, घडय़ाळ चिन्हाबाबत वाद नाही!; जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण

आगामी लोकसभा निवडणूक मार्च-एप्रिल २०२४ मध्ये होणार आहे. त्या दृष्टीने राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये पुणे लोकसभा मतदारसंघ कोणाकडे असणार, याबाबत दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. त्यातच आता मनसेनेही पुणे लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

मनसे नेते अमित ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात पुणे दौरा केला होता. त्या वेळी लोकसभा मतदारसंघाचा आढावा त्यांनी घेतला होता. अमित ठाकरे यांच्या बैठकीत आधी उमेदवाराचे नाव निश्चित करा, अशी मागणी करण्यात आली होती. मतदारांपर्यंत कसे पोहोचता येईल, कोणते मुद्दे उपस्थित केले पाहिजेत, पुण्यातील कोणत्या भागात पक्ष संघटन मजबूत आहे आणि कोणत्या भागावर अधिक जोर देण्याची शक्यता आहे, या संदर्भात त्यांनी काही सूचना केल्या होत्या.

हेही वाचा >>> राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वय समिती बैठकीचा आज समारोप; देशातील ज्वलंत प्रश्नांवर ऊहापोह

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्थानिक पातळीवर बैठक घेण्याची सूचनाही त्यांनी केली होती. त्यानुसार शुक्रवारी आढावा बैठकीची पहिली फेरी पूर्ण झाली. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बाळा शेडगे, अजय शिंदे आणि शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी या संदर्भात बैठक घेतली. आढावा बैठका पूर्ण झाल्यानंतर त्या संदर्भातील अहवाल राज ठाकरे यांना देण्यात येणार आहे. मनसे आगामी लोकसभा निवडणूक लढविणार आहे. त्या दृष्टीने ही बैठक होती. या बैठकीत संभाव्य उमेदवारांच्या नावांबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. केवळ पक्षाच्या ताकतीचा आढावा घेण्यात आला. उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय राज ठाकरे घेणार आहेत. आढावा बैठकीची दुसरी फेरी गणेशोत्सवानंतर होणार असून, त्यानंतर अमित ठाकरे हे विभागनिहाय मेळावे आणि बैठका घेणार आहेत, अशी माहिती अजय शिंदे यांनी दिली.