लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाकडून पुण्यामध्ये राजकीय स्टंटबाजी करण्यात येत असल्याची टीका काँग्रेसचे आमदार मोहन जोशी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. पुण्याच्या प्रश्नांसाठी भाजपच्या आमदारांनी नागपूर अधिवेशनात काय केले ते त्यांनी सांगावे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुणे दौऱ्याच्या दरम्यान भाजपच्या वतीने पीएमआरडीएच्या स्थापनेसह शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या प्रकल्पांचे प्रतिकात्मक उद्घाटन करून निदर्शने करण्यात आली. त्या पाश्र्वभूमीवर आमदार जोशी यांनी पत्रकार परिषदेत भाजपच्या भूमिकेवर टीका केली. नागपूर अधिवेशनात पुण्याचे प्रश्न सोडविण्याबाबत भाजपचे सर्व आमदार निष्क्रिय राहिले, असा आरोप करून जोशी म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी पुण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वाधिक वेळ दिला आहे. भाजपकडून खोटी माहिती देऊन दिशाभूल करण्यात येत आहे.
पुण्याचा मेट्रो प्रकल्प, तेवीस गावांचा विकास आराखडा, पानशेत पूरग्रस्तांच्या मालकीची घरे, भामा-आसखेड पाणी योजना, एलबीटीची सर्वमान्य अंमलबजावणी, चाकण विमानतळ, स्वारगेट उड्डाणपूल व केंद्र शासनाच्या जेएनएनयूआरएमच्या माध्यमातून हजारो कोटींची कामे पुण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मार्गी लावली. त्यांच्यावर केवळ राजकीय हेतूने टीका केली जात आहे. यामागे संकुचित राजकारण आहे, असेही जोशी म्हणाले.