पुणे : ‘भारत हा तरुणांचा देश म्हणून उदयास आला असून, तरुणांच्या क्रयशक्तीवर विश्वास दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहिले आहे. हे स्वप्न सत्यात उतरविण्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्र मोलाची भूमिका निभावत आहे,’ असे मत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे चेअरमन आणि ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले.

अर्थ संवाद, सहकार भारती आणि ग्लोबल इंडियन ओरिजीन नेटवर्क यांच्यातर्फे आयोजित ‘बँकिंग अँड एमएसएमई सेक्टर कॉन्क्लेव्ह २०२५’ या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते रविवारी झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ उद्योजक आणि ‘ॲप्लाईड इनोव्हेशन टेक्नॉलॉजी ग्रुप’चे मानद अध्यक्ष राम भोगले, ‘यशस्वी ग्रुप’चे संस्थापक अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, चितळे उद्योग समूहाचे संचालक इंद्रनील चितळे, ‘बढेकर ग्रुप’चे संस्थापक अध्यक्ष प्रवीण बढेकर, ‘सहकार भारती पुणे महानगर’चे अध्यक्ष दिनेश गांधी आणि या परिषदेचे आयोजक सहकार भारती पुणे महानगरचे बँकिंग प्रकोष्ट प्रमुख डॉ. केतन जोगळेकर आदी उपस्थित होते.

या वेळी अनास्कर म्हणाले, ‘देशात १५ ते २९ वयोगटातील तरुणांच्या बेरोजगारीचा दर १०.५ टक्के आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या माध्यमातून या तरुणांच्या हातांना काम दिल्यास आणि त्यांच्या क्रयशक्तीचा उपयोग करून घेतल्यास अर्थव्यवस्थेला गती मिळेल. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राद्वारे केवळ अर्थव्यवस्थेला चालना मिळणार नसून, सर्वाधिक रोजगार करणारे निर्माण क्षेत्र म्हणून याकडे पाहिले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग यांच्यासह बँका, कर सल्लागार आणि उद्योजक यांचे जाळे उभे केले पाहिजे. बँकिंग क्षेत्रानेही पारंपरिक दृष्टीकोन न ठेवता दोन पावले पुढे येत उद्योजकांच्या नवकल्पनांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे.’ प्रास्ताविकात डॉ. केतन जोगळेकर यांनी परिषद आयोजित करण्यामागील भूमिका मांडली. ममता क्षेमकल्याणी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.