पुणे : ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ असे देशपातळीवरील अनेक पुरस्कार मिळवूनदेखील शहरातील अनेक रस्त्यांवर कचरा पडलेला असतो. यावर उपाययोजना करण्याबरोबरच स्वच्छतेमध्ये नागरिकांचा सहभाग वाढावा, यासाठी शहरात लवकरच विशेष अभियान राबविले जाणार आहे.स्वच्छतेच्या संदर्भात नागरिकांचा सहभाग, जनजागृतीबरोबरच प्रशासकीय यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे महापालिका आयुक्त नवल किशाेर राम यांनी सांगितले. महापालिका आयुक्त राव यांनी शुक्रवारी शहरात स्वच्छतेचे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. बैठकीला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन, पृथ्वीराज बी. पी., ओमप्रकाश दिवटे, तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम आदी उपस्थित होते.
‘या बैठकीत स्वच्छ पुणे अभियानांतर्गत शहरातील कचरा वर्गीकरणाचे प्रमाण शंभर टक्क्यांपर्यंत नेणे, कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प सुरू करणे, वस्ती पातळीवर जागृती मोहीम राबवणे, शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा शहर स्वच्छतेमध्ये सहभाग वाढविणे आदी विषयांवर बैठकीत चर्चा झाली. स्वच्छतेमध्ये नागरिकांचा सहभाग वाढावा, याकडे भर देण्यात येणार आहे,’ असे आयुक्त राम यांनी सांगितले.
महापालिकेच्या यंत्रणेकडूनदेखील अनेकदा स्वच्छतेच्या कामाकडे दुर्लक्ष हाेते. स्वच्छतेच्या कामात प्रशासकीय यंत्रणेच्या त्रुटी दूर करण्यावर यापुढील काळात अधिक भर राहणार आहे. शहरात स्वच्छतेचे काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची, तसेच झाडणकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हजेरी संदर्भात लक्ष दिले जाणार आहे. या कर्मचाऱ्यांची हजेरी नाेंदविण्यासाठी त्यांना देण्यात आलेल्या उपकरणांची माहिती घेऊन यामध्ये अधिकाधिक पारदर्शकता कशी येईल, तसेच कर्मचाऱ्यांसह शहरातील नागरिकांचा सहभाग कसा वाढेल, यावर भर दिला जाणार आहे,’ असे राव यांनी स्पष्ट केले.
केंद्र, राज्य पातळीवर स्वच्छतेबाबत अभियान राबविले जाते. पुणे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी त्याच पद्धतीने अभियान राबविण्याचा प्रयत्न आहे. यासाठी समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्रुटी दूर केल्या जाणार आहेत. स्वच्छता मोहिमेत सर्वांचा सहभाग कसा होईल, यासाठी प्रयत्न असणार आहे. नवल किशोर राम,महापालिका आयुक्त