पुणे :पर्वती जलशुद्धीकरण केंद्र ते एसएनडीटीदरम्यान जलवाहिनीतील गळतीमुळे कोथरूड परिसरातील विस्कळीत झालेला पाणीपुरवठा रविवारी सलग तिसऱ्या दिवशीही कायम राहिला. मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, स्टेट बँक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, तेजस नगर, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदानगर या भागांतील अनेक सोसायट्या, गृहसंकुलांना त्याचा फटका बसला. विस्कळीत, अपुऱ्या आणि कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याच्या अनेक तक्रारी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आल्या.

दरम्यान, जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, सोमवारपासून कोथरूड परिसराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे स्पष्टीकरण महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रसन्न जोशी यांनी दिले.पर्वती जलशुद्धीकरण केंद्र ते एसएनडीटी या जलवाहिनीमध्ये गळती होत असल्याचे शनिवारी (१९ जुलै) संध्याकाळनंतर उघडकीस आले होते. त्यानंतर पाणीपुरवठा विभागाने दुरूस्तीचे काम तातडीने हात घेतले. गळतीमुळे रविवारी (२० जुलै) एसएनडीटी केंद्राचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या केंद्रातून पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या कोथरूड, शिवाजीनगर, औंध तसेच कर्वेनगर परिसरातील रहिवाशांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. मात्र, गळतीमुळे शुक्रवार आणि शनिवारी, तर दुरुस्तीच्या कामांमुळे रविवारीही पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता.

‘गुरुवारी (१७ जुलै) देखभाल-दुरूस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी कमी दाबाने पाणी आले. शनिवारी सकाळी जलवाहिनी फुटल्यामुळे पाणी येणार नसल्याचे सांगण्यात आले. तर, रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास कमी दाबाने पाणी आले. तीन दिवस सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला होता,’ असे डाव्या भुसारी कॉलनीत राहणारे शैलेश केळसकर यांनी सांगितले.

अलीकडे या परिसराला पाणीपुरवठ्याचा प्रश्न सातत्याने भेडसावत आहे. देखभाल-दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद करूनही बिघाड दुरुस्त होत नाही. गेल्या शुक्रवारपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला. तो रविवारीही कामय राहिला. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. घरात पाणी नसल्याने रोजची सर्व कामे खोळंबली होती.- प्रसाद गौरखेडे, रहिवासी, उजवी भुसारी कॉलनी

नागरी वसाहत मोठ्या प्रमाणात वाढते आहे. त्या तुलनेत महापालिकेकडून पाणी, वीज अशा मूलभूत सुविधांची पूूर्तता केली जात नाही. खडकवासला, वारजे परिसरात पाण्याचा प्रश्न सातत्याने भेडसावतो आहे.- प्रशांत कनोजिया, सामाजिक कार्यकर्ते

कोणत्या भागाला फटका ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संपूर्ण कोथरूड परिसर, गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, स्टेट बँक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, तेजस नगर, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, जयभवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी, गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडियल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनवाडी, वैदूवाडी, पोलीस लाईन, संगमवाडी, विधी महाविद्यालय रस्ता, पौड रोड, शीला विहार कॉलनी, अद्वैत सोसायटी, भीमनगर, वेदांत नगरी, कुलश्री कॉलनी, सहवास, क्षिप्रा, मनमोहन सोसायटी, विठ्ठल मंदिर परिसर, गोसावी वस्ती, करिष्मा सोसायटी, बंधन सोसायटी परिसर, मयूर कॉलनीसह कर्वे रोड ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, एरंडवणा परिसर, दशभुजा गणपती ते नळ स्टॉप, सहकार वसाहत म्हात्रे पूल परिसराचा पाणीपुरवठा गळतीमुळे विस्कळीत झाला होता.