मातोश्रीचा जीव मुंबई युती होईल की नाही, यामध्ये अडकला आहे, असा टोला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला आहे. ‘मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती होईल की नाही याकडे मातोश्रीचे लक्ष लागले आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते आशिष शेलारदेखील यातच गुरफटले आहेत,’ असे म्हणत अजित पवार यांनी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांवर चौफेर टीका केली. ‘भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे काय बोलतात, हे त्यांचे त्यांनाच कळत नाही. जुन्या नोटा द्या, मी नवीन नोटा देतो, असे रावसाहेब दानवे कसे काय म्हणू शकतात ?,’ असा सवाल यावेळी अजित पवारांनी उपस्थित केला आहे.

‘ज्या व्यक्तीची भूमिका वेगळ्या विदर्भाची आहे ती व्यक्ती पिंपरी-चिंचवडवर का प्रेम करेल ?,’ असा प्रश्न विचारत अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ‘ज्याप्रकारे शिवसेनेचे मुंबईवर प्रेम आहे. त्याप्रमाणे माझे पिंपरी चिंचवडवर प्रेम आहे,’ असे अजित पवार पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना म्हणाले.