पुणे : ‘एअर इंडिया’च्या सेवेचा फटका राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना मंगळवारी बसला. दिल्लीवरून पुण्यासाठी येणाऱ्या विमानाला तीन तासांहून अधिक विलंब झाल्याने सुळे यांनी ‘एअर इंडिया’च्या व्यवस्थापनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय आणि संबंधित मंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करून हवाई कंपनीला जबाबदार धरण्याची मागणी केली.

खासदार सुळे मंगळवारी दिल्ली विमानतळावरून पुणे विमानतळापर्यंत येत असताना एअर इंडिया विमान क्रमांक एआय २९७१ प्रवास करण्यासाठी विमानत बसल्या. मात्र, तीन तास उशिराने विमान उड्डाण झाले. त्यामुळे सुळे आणि विमानातील प्रवासी विमानातच ताटकळत बसून राहिले. या वेळी विमान कंपनीकडून प्रवाशांना कुठल्याच प्रकारची माहिती देण्यात आली नाही.

अखेर खासदार सुळे यांनी संतप्त होऊन समाज माध्यमावर ‘विमान प्रवाशांना उत्तम सेवा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. मात्र ‘एअर इंडिया’ची ही उदासीनता अस्वीकारार्ह आहे. तीन तासांपासून प्रवासी विमानातच अडकून पडले असून, कुठलीही कल्पना दिली जात नाही. त्यांना कोणतेही सहाय्य मिळत नाही. याबाबत तातडीने कार्यवाही करून प्रवाशांना न्याय मिळावा.’ अशी टिप्पणी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या टिप्पणीनंतर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी तातडीने ‘एअर इंडिया कंपनी’च्या अधिकाऱ्यांना आणि विमानतळ प्राधिकरणाशी संपर्क साधला. या वेळी विमानतळ प्राधिकरणाकडून हवामानामुळे विमानाच्या उड्डाणाला विलंब झाल्याचे स्पष्ट केले.