चाळीस वर्षांपूर्वी एक टपाल खाते सोडले, तर खासगी कुरिअर कंपन्यांची आजच्यासारखी भाऊगर्दी नव्हती. त्या काळी पुण्यातील एका माणसाने कुरिअर सेवा सुरू केली आणि ती आजही स्पर्धेत आपले स्थान टिकवून ठेवत देशात आणि जगात कुरिअर पोहोचवते आहे.
आज अगदी म्हणाल ती वस्तू मोबाईलवरून ‘ऑर्डर’ करता येते आणि दिलेल्या वेळेत ती दारात हजरही होते. कुरिअर सेवा सामान्य माणसाला जवळच्या वाटू लागल्या आणि अंगवळणी पडल्या त्या त्यांच्या या घरबसल्या मिळणाऱ्या सेवेमुळे. पण ही सगळी सोय अलीकडच्या काही वर्षांतली. काळ आणखी थोडा- म्हणजे जवळपास चाळीस वर्षांनी ‘रीवाईंड’ करून पाहिला, तर आजच्यासारख्या कुरिअर सेवा बोकाळल्या नव्हत्या. कुठे एखादे पार्सल, औषधे, अगदी महत्त्वाची – बऱ्याचदा नोकरीची कागदपत्रे अशा फार महत्त्वाच्या कामांसाठी ही सेवा वापरली जाई. पोस्टाची सेवा सोडली तर त्यात खासगी कंपन्या जवळपास नगण्य म्हणाव्यात अशा. त्या काळी पुण्यातल्या एका मराठी माणसाने कुरिअर सेवा सुरू केली आणि आज असंख्य कुरिअर कंपन्यांच्या स्पर्धेतही ती उत्तम सुरू आहे. हेच ते ‘पाळंदे कुरिअर’.
यशवंत पाळंदे यांनी १९६८ मध्ये भागीदारीत व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला ही कुरिअर सेवा नव्हती. ते मोटारी भाडय़ाने देत आणि त्यासाठी त्यांना सतत मुंबईला जावे लागे. त्या काळी पुण्यातील उद्योग क्षेत्रासाठी वाहतुकीच्या सुविधा आताएवढय़ा तयार झाल्या नव्हत्या. त्यामुळे उद्योगातील ओळखीचे लोक आपल्याला लागणारा माल पाळंदेंना मुंबईहून आणण्यास सांगू लागले. मग पाळंदे यांनी त्यावरच लक्ष केंद्रित केले. पुण्यातून व्यापाऱ्यांकडून मालाची मागणी घेऊन ते मुंबईला जायचे आणि मागणीनुसार माल विकत घेऊन तो परत पुण्यास आणून पोचवायचे. सुरुवातीला पाळंदे स्वत: ‘डेक्कन क्वीन’ने मुंबईस ये-जा करत. तर खरेदी माल दुसऱ्या वाहतूक व्यवस्थेने किंवा ‘सह्य़ाद्री’ने पुण्यात येत असे.
१९८१ पर्यंत हा व्यवसाय सुरू राहिला आणि दरम्यानच्या काळात त्यांचे मोटारी भाडय़ाने देणे बंद झाले. त्यानंतर बँकांचे काही नवे नियम आले. त्यानुसार इतर शाखांचे (आऊटस्टेशन) धनादेश चौदा दिवसात वठणे गरजेचे होते. धनादेश वेळेवर वठावेत यासाठी ते कुरिअरने पोचवता येतील का, याचा पर्याय बँका शोधू लागल्या आणि पाळंदेंना तशी विचारणाही होऊ लागली. पुणे आणि मुंबईबरोबरच त्यांनी सातारा आणि कोल्हापूरमध्ये शाखा सुरू केल्या. बँकांचे धनादेश कुरिअरने पोहोचवण्याचे काम जोरात सुरू झाले. ऑर्डरचा माल पोहोचवणे आणि ‘पार्सल’चा व्यवसाय तुलनेने कमी होऊन कागदपत्रे पोहोचवण्याचा व्यवसाय वाढू लागला. १९८५ नंतर त्यांनी कुरिअरसाठी स्वत:च्या गाडय़ा सुरू केल्या. सुरुवातीला कुरिअर पोचवायला माणसे एसटीने जात. जसजशी एकेका ठिकाणाहून कुरिअरची कामे वाढू लागली तसतशा या गाडय़ा पाठवण्यास सुरुवात झाली.
[jwplayer 5wiGmq72]
पूर्वी पोस्टाव्यतिरिक्त कुरिअर सेवा नव्हत्याच. त्यामुळे १९९२ पर्यंत त्यांना काहीच स्पर्धा नव्हती. नाही म्हणायला पाळंदे यांनी सुरुवात केली तेव्हा पुणे-मुंबईपुरत्या काही कुरिअर सेवा होत्या, पण त्या पुढे टिकू शकल्या नाहीत. पाळंदे राज्याबाहेर पोचले ते १९९९ मध्ये. भारतभर कुरिअर पोचवण्याचे जाळे असलेल्या एका कंपनीशी त्यांनी भागीदारी करून पाळंदेंचे कुरिअरही देशात जाऊ लागले. याच प्रकारे आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी भागीदारीतून तिथेही ते सेवा पुरवू लागले. ज्या प्रदेशात ज्या कुरिअर कंपनीचे जाळे उत्तम त्यांच्याशी भागीदारी करायची, हे पाळंदेंनी अवलंबले. सध्या ते देशात १२०० ठिकाणी, तर जगात जवळपास १०० ठिकाणी कुरिअर सेवा पुरवतात. त्यांची ‘पिकअप’ केंद्रेही राज्यात ३५० ठिकाणी आहेत. केवळ पुण्यातच अशी ६६ केंद्रे आहेत.
आता यशवंत पाळंदेंचा मुलगा आशिष आणि सून अर्चना हे व्यवसाय सांभाळतात. आता कुरिअर व्यवसायात स्पर्धा पुष्कळच वाढली आहे. पण कोणत्याही स्पर्धेत टिकून व्यवसाय वाढवायचा असेल तर आपले काहीतरी वैशिष्टय़ तयार करायला हवे, हा यशस्वी व्यावसायिकांचा ‘फंडा’ आशिष देखील सांगतात. अगदी तालुका आणि गाव पातळीपर्यंत पसरलेले कुरिअर सेवेचे जाळे आणि स्वत:च्या वाहतूक व्यवस्थेमुळे आलेली विश्वासार्हता हे आपले ‘निश’ (वैशिष्टय़) असल्याचे ते सांगतात. जवळपास ९९ टक्के कुरिअर दारात पोहोचवले जाते. एक ते दोन हजार वस्तीच्या गावापर्यंत हे शक्य होते. मात्र गाव फारच दुर्गम वा छोटे असेल ते नागरिक जवळच्या ‘पिकअप’ केंद्रात येऊन आपले कुरिअर घेऊन जातात.
आपल्याला विशेष जाहिरात कधीच करावी लागली नाही, असेही आशिष आवर्जून नमूद करतात. पुण्यातील अनेक जुन्या व्यवसायांप्रमाणेच पाळंदेंनाही ‘माऊथ पब्लिसिटी’ जाहिरातीपेक्षा जास्त महत्त्वाची वाटते. यापुढे कुरिअर सेवांसाठी ‘ई-कॉमर्स’ ही मोठी संधी असल्याचे आशिष पाळंदे सांगतात. पाळंदेंनी या क्षेत्रात शिरकावही केला आहे. ‘ई-कॉमर्स’ कंपन्यांच्या वेअर हाऊसमधून माल घेणे व ग्राहकांना नेऊन देणे अशा प्रकारची सेवा त्यांनी सुरू केली आहे. यापुढे अन्नपदार्थाच्या शीतसाखळी व्यवसायातील (कोल्ड चेन लॉजिस्टिक्स) माल वाहतुकीला चालना मिळेल आणि कुरिअर सेवा म्हणूनही ती एक उत्तम संधी आहे, असे त्यांना वाटते. फारशी स्पर्धा नसताना एका वेगळ्याच व्यवसायात केलेला प्रवेश, काळानुरूप सुरू केलेल्या नव्या सुविधा आणि आताच्या मोठय़ा स्पर्धेत दर्जा टिकवून ठेवत टिकून राहण्याचा प्रयत्न यामुळेच पुण्याचा हा ‘ब्रँड’ वेगळा ठरतो.
sampada.sovani@expressindia.com
[jwplayer a1LQnDt7]