पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण विभागासाठी पुढील पाच वर्षांचा धोरणात्मक आराखडा तयार करणार आहे. त्यासाठी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची कार्यशाळा घेण्यात आली. शिक्षण विभागासाठी प्राधान्यक्रम निश्चित करणे, नवीन आव्हाने यावर सविस्तर चर्चा झाली. कार्यशाळेतून आलेल्या सूचनांच्या आधारे शिक्षण विभागासाठी सर्वसमावेशक, विद्यार्थी-केंद्रित आणि दूरदर्शी धोरणात्मक आराखडा तयार केला जाणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.
महापालिकेने ‘व्हिजन@५० शहर धोरण’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत विविध क्षेत्रांतील व्यक्तींशी चर्चा करण्यात येत आहे. शहराचा विकास करताना प्राधान्यक्रम कोणत्या गोष्टींना द्यावा? कोणत्या क्षेत्रांना महत्त्व द्यावे? येथील शिक्षण व्यवस्था कशी असावी? पर्यावरण उत्तम राहावे यासाठी काय उपाययोजना कराव्यात? अशा विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी या उपक्रमांतर्गत वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींच्या कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने गुरुवारी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची कार्यशाळा झाली.
आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, सहायक आयुक्त किरणकुमार मोरे, रजिया फरीदा यांच्यासह शिक्षण शेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शहरातील शिक्षण क्षेत्राचा सविस्तर आढावा घेऊन, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे डेटा-आधारित विश्लेषण, शालाबाह्य मुले, शाळांमध्ये राबविलेल्या सर्वोत्तम पद्धतींचे सादरीकरण आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शिक्षण व्यवस्थेतील यशस्वी पद्धती, शिक्षण विभागासाठी प्राधान्यक्रम निश्चित करणे, या क्षेत्रातील नवीन आव्हाने यावर चर्चा करण्यात आली.
‘क्रीडा व सर्जनशील उपक्रमांना महत्त्व द्यावे’
महापालिकेतील पाच विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभागी होऊन त्यांच्या शालेय जीवनातील अनुभव आणि भविष्यात शाळांमध्ये पाहायला आवडणारे बदल याबाबत मते व्यक्त केली. डिजिटल साधनांचा वापर वाढवणे, शिक्षक-विद्यार्थी संवाद अधिक प्रभावी करणे, क्रीडा व सर्जनशील उपक्रमांना अधिक महत्त्व देणे, मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता यांसारख्या मुद्द्यांवर विद्यार्थ्यांनी भर दिला.
शहरातील प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण, समावेशक शिक्षण मिळावे, हा मुख्य उद्देश आहे. या धोरणात्मक आराखड्याद्वारे शाळा सुधारणासह संपूर्ण शिक्षण संस्कृतीत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे. विद्यार्थ्यांच्या गरजा, शिक्षकांचे योगदान आणि समाजाची अपेक्षा लक्षात घेऊन तयार होणारा हा आराखडा पुढील पाच वर्षांत शहराच्या शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देईल, असे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी म्हटले आहे.
नवीन आराखड्यामुळे पुढील पाच वर्षांत शहरातील शिक्षण क्षेत्रात एक आदर्श उभा राहील. डिजिटल साधनांचा वापर, शिक्षक प्रशिक्षण, शाळेतील पायाभूत सुविधा सुधारणा आणि विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व मानसिक आरोग्याला महत्त्व देण्यात येईल. यामुळे सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळेल, असा विश्वास सहायक आयुक्त किरणकुमार मोरे यांनी व्यक्त केला.