भरधाव वाहनांमुळे शहराच्या वेगवेगळ्या भागात गेल्या सात महिन्यात ४८ पादचारी मृत्युमुखी पडले आहेत. पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील वाहतुकीचे समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. वाहतूक विषयक समस्या तसेच उपाययोजनांबाबत सेव्ह पुणे ट्रॅफिक मुव्हमेंट संस्थेकडून अपघाती मृत्युंची वार्षिक आकडेवारी संकलित करण्यात येत असून आकडेवारीआ अभ्यास करण्यात येत आहेत. २०१६ ते २०१९ या कालावधीत रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या कमी होत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची टक्केवारी विचारात घेतल्यास अपघातात ५० ते ५५ टक्के मृत्यू दुचाकीस्वारांचे होतात. पादचारी मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण ३० ते ३५ टक्के आहे. याबाबत सेव्ह ट्रॅफिक मुव्हमेंट संस्थेचे हर्षद अभ्यंकर म्हणाले ‘दुचाकीस्वारांना हेल्मेट परिधान करणे बंधनकारक करण्यात आल्यानंतर राजकीय पक्षांकडून हेल्मेट सक्तीला विरोध करण्यात आला. हेल्मेटमुळे दुचाकीस्वारांना गंभीर दुखापत होत नाही. हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांचे प्रमाण मोठे आहे.’
पादचाऱ्यांच्या सुरक्षेकडे कानाडोळा

सिग्नल असलेले चौक पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यास सोपे असतात. काही चौकात पादचारी पट्टे (झेब्रा क्रॅासिंग) तसेच पादचाऱ्यांसाटी सिग्नल नाहीत. शहरातील चौकांची पाहणी करण्यात आली. तेव्हा ३० ते ५० टक्के चौकात पादचारी पट्टे आहेत. पादचाऱ्यांसाठी सिग्नल यंत्रणा नाही. पादचारी सिग्नल कार्यान्वित असणारे चौक अभावाने सापडतील. २०१६ ते २०१९ या कालावधीत पादचारी मृत्यूचे प्रमाण जास्त होते. २०२० मध्ये करोना संसर्गामुळे शहरात निर्बंध होते. २०१० मध्ये वर्षभरात ३४ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. निर्बंध शिथिल झाल्यानंतर २०२१ मध्ये शहरातील वेगवेगळ्या भागात ८४ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला. यंदा जुलै अखेरीपर्यंत ४८ पादचारी मृत्युमुखी पडले असून पादचारी मृत्युची वाढती संख्या चिंताजनक आहे, सेव्ह पुणे ट्रॅफिक मुव्हमेंटचे हर्षद अभ्यंकर यांनी नमूद केले.