पिंपरी : पाझर तलावात पोहायला गेलेल्या चार शाळकरी मुलांचा दमछाक होऊन बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास चाकणजवळील कडाची वाडी येथे घडली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी चिमुरड्यांचे मृतदेह बाहेर काढले.

ओंकार बाबासाहेब हंगे (वय १३, सध्या रा. मार्तंडनगर, मेदनकरवाडी, मूळ रा. हंगेवाडी, ता.केज, जि.बीड), श्लोक जगदीश मानकर (वय १३ वर्षे, सध्या रा. मेदनकरवाडी, मूळ रा.धनवडी, ता. वरुड, जि. अमरावती), प्रसाद शंकर देशमुख (वय १३ वर्षे, सध्या रा. मेदनकरवाडी, मूळ रा.अंबुलगा, ता. मुखेड, जि.नांदेड) आणि नैतिक गोपाल मोरे (वय १३ वर्षे, सध्या रा. मेदनकरवाडी, मूळ रा. बुलढाणा झरी बाजार, ता. अकोट, जि. अकोला) अशी बुडून मृत्युमुखी पडलेल्या शाळकरी मुलांची नावे आहेत.

चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौघे जण शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान पोहण्यासाठी गेले होते. चाकणजवळील कडाची वाडी गावच्या हद्दीतील पाझर तलावामध्ये पोहण्यासाठी उतरले होते. पोहताना दमछाक होऊन या सर्वांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दुपारपर्यंत हे चौघे जण घरी न आल्याने नातेवाइकांनी त्यांचा परिसरात शोध घेतला. पाझर तलावाच्या काठावर त्यांच्या चपला आणि कपडे मिळाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्थानिक नागरिकांसह आपदा मित्रांच्या मदतीने पोलिसांनी पाण्यात बुडालेल्या मुलांचे मृतदेह बाहेर काढले. चाकण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, याप्रकरणी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. मुलांचे वडील मजुरीचे काम करतात.