पुणे : ‘कवितेमध्ये एखाद्याचे आयुष्य सामावलेले असते. मुळात आयुष्यरूपी काव्य जगणे हेच एक आव्हान आहे’, असे मत प्रसिद्ध अभिनेते मकरंद देशपांडे यांनी व्यक्त केले. शब्दमल्हार प्रकाशनाच्या वतीने स्वानंद बेदरकर यांच्या ‘पावसाच्या गर्भतळी’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन मकरंद देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि प्रसिद्ध समीक्षक डॉ. रणधीर शिंदे या वेळी उपस्थित होते.
देशपांडे म्हणाले, ‘कवितेमध्ये ताकद असते. काव्याला मापदंड आणि सीमाही नसतात. पावसाच्या प्रत्येकाच्या काही ना काही आठवणी असतात. पाऊस तुम्हाला भिजवत असतो. भिजणे हे प्रत्येकाच्या मनोभूमिकेवर अवलंबून असते. बाहेर जेवढे स्वच्छ पाहाल तेवढे तुमचे अंतर्मन स्वच्छ होते.’
जोशी म्हणाले, ‘पाऊस आणि कविता यांच्या निर्मितीमध्ये एक साम्य असते. निर्मितीपूर्वी तगमग सहन करावी लागते. पाऊस असो किंवा कविता, कोसळण्यापूर्वीच शब्दांत व्यक्त करता येत नाही आणि कोसळल्यानंतर शब्दांत पकडता येत नाही. मराठीत बऱ्याच वर्षांनी एकाच विषयाला वाहिलेला कवितासंग्रह आलेला आहे. प्रतिमा आणि प्रतीकांच्या अभयारण्यात कविता हरवण्याची शक्यता असते. बेदरकर यांच्या संदर्भात असे घडलेले दिसत नाही. आतली ओल टिकून राहिली, तरच उत्तम कविता निर्माण होते.’शिंदे यांनी पुस्तकाची समीक्षात्मक मांडणी केली. बेदरकर यांनी आपल्या मनोगतातून लेखन प्रवास उलगडला. पीयू शिरवाडकर-आरोळे यांनी सूत्रसंचालन केले.