पिंपरी : राजीव गांधी आयटी पार्कमधील वाढती वाहतूक कोंडीची समस्या साडेविण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुरुवारी हिंजवडीतील रस्त्यांची पाहणी केली. विरुद्ध दिशेने सुरू असलेल्या वाहतुकीच्या रस्त्यांवर सुरक्षा कठडे (बॅरिकेड्स) लावण्यात आले. तसेच, काही ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर महिनाभरासाठी वाहतूक वळवण्यात यावी, अशा सूचना पोलीस आयुक्त चौबे यांनी केल्या.
सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीएचे) अपर आयुक्त दीपक सिंगला, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील, परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, वाकडचे सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, ‘अनक्लाॅग हिंजवडी आयटी पार्क’ मोहिमेचे सचिन गुणाले, सचिन लोंढे तसेच महावितरण, पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमल) आणि एमआयडीसीचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पोलीस आयुक्त चौबे आणि अधिकाऱ्यांनी आयटी पार्कमधील काही ठिकाणांची पाहणी करून उपाययोजना सुचवल्या. सातत्याने कोंडी होणाऱ्या रस्त्यांवर तसेच चौकांतील वाहतूक वळविण्यात यावी, काही ठिकाणी एकेरी वाहतूक करण्यात यावी. महिनाभर प्रायोगिक तत्त्वावर हे वाहतूक बदल करण्यात यावेत, अशा सूचना आयुक्त चौबे यांनी केल्या. हिंजवडी वाहतूक विभागाच्या कार्यालयापासून पाहणी सुरू केली. तेथील पुलाच्या सेवारस्त्यालगत असलेले महावितरण कंपनीचे रोहित्र (डीपी) हटविण्याबाबत सूचना केली. त्यामुळे सेवा रस्त्यावरील फ्री लेफ्ट अधिक सोयीचा होईल. जांभूळकर चौक, इंडियन आयल पेट्रोल पंप चौकातील सर्कल अर्धे करावे. शेल पेट्रोल पंप चौकातील विरुद्ध दिशेने येणारी वाहतूक बंद केली. माइंड ट्री कन्सल्टिंग चौक येथे वाहतूक उपाययोजनांचा आढावा घेतला. डाॅलर कंपनीजवळील नाल्यावरील अतिक्रमण हटवण्याची सूचना केली. एमआयडीसी सर्कल येथे विरुद्ध दिशेने जाणारी वाहने थांबवण्यासाठीसुरक्षा कठडे लावले. मेगा पोलीस सर्कल येथे बससाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची सूचना केली. माण रस्त्यावरील टप्पा एकवरील पांडवनगरमधील काढलेल्या अतिक्रमणाची पाहणी केली. तेथील उर्वरित एक अतिक्रमण हटविण्याच्या सूचना केल्या.
अनक्लाॅग हिंजवडी आयटी पार्क मोहिमेंतर्गत वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सह्यांची मोहीम राबविली. तसेच, उपाययोजना सूचविल्या आहेत. त्याचा ५७ पानी अहवाल हिंजवडी पोलीस ठाण्यात आयुक्त चौबे यांना देण्यात आला. कोणत्या ठिकाणी काय उपाययोजना कराव्यात याबाबतचे जिओ टॅगिंग केले आहे. त्यामुळे तीन ते चार महिन्यांत वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. काही ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर महिनाभरासाठी वाहतूक वळवण्यात येणार असल्याचे मोहिमेचे संयोजक सचिन लोंढे यांनी सांगितले.