पुणे : ‘गेल्या अकरा वर्षांपासून देशात स्थिर सरकार असून सन १९८४ नंतर देशाला प्रथमच स्थिर सरकार मिळाले आहे. या अकरा वर्षांत सर्व घटकांसाठी विविध योजना राबविण्यात आल्या असून, एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही,’ असे माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी येथे सांगितले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहर भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जावडेकर बोलत होते. शहराध्यक्ष धीरज घाटे, संदीप खर्डेकर, सरचिटणीस रवींद्र साळेगावकर, पुनीत जोशी, अमोल कविटकर, हेमंत लेले यावेळी उपस्थित होते.

जावेडकर म्हणाले, ‘काँग्रेसप्रणित आघाडीच्या सरकारच्या काळात मंत्र्यांवर सतत भ्रष्टाचाराचे आरोप होत होते आणि या मंत्र्यांना राजीनामाही द्यावा लागला. तसे मोदी सरकारच्या काळात घडले नाही. सर्वांचा विकास या तत्त्वानुसार सर्व घटकांसाठी सरकारने गेल्या अकरा वर्षांत काम केले आहे. केंद्र सरकारने संरक्षण उत्पादनांच्या देशाअंतर्गत उत्पादनाला चालना दिली. त्यामुळे भारत आता शस्त्रास्त्रांची निर्यात करणारा देश बनला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मधून भारताच्या सामर्थ्याचे दर्शन जगाला घडले. संरक्षण खरेदीतील ‘दलालां’ची हकालपट्टी केली आहे. सर्व घटकाला न्याय देण्यात आल्याने देशाचा विकास वेगाने होत आहे.