पुणे : मार्केट यार्डातील घाऊक बाजारात आवक वाढल्याने बटाटा, भेंडी, काकाडी,कारली, फ्लाॅवर, वांगी, ढोबळी मिरची, घेवडा, मटार फळभाज्यांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी घट झाली. टोमॅटो, तोतापुरी कैरीच्या दरात वाढ झाली असून, अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती घाऊक बाजारातील व्यापाऱ्यांनी दिली.
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून मिळून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरातमधून मिळून ४ ते ५ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून मिळून ३ ते ४ टेम्पो शेवगा, कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेशातून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटकातून ४ ते ५ टेम्पो पावटा, आंध्र प्रदेश, कर्नाटकातून १ टेम्पो तोतापुरी कैरी, गुजरात आणि मध्य प्रदेशातून ७ ते ८ टेम्पो लसूण अशी आवक झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
पुणे विभागातून सातारी आले ४०० ते ५०० गोणी, भेंडी ७ ते ८ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, टोमॅटो ७ ते ८ हजार पेटी, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, काकडी ८ ते १० टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लाॅवर १४ ते १५ टेम्पो, भुईमूग शेंग १०० गोणी, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, मटार ५०० ते ६०० गोणी, कांदा ७० ते ७५ ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून ५० ते ५२ ट्रक बटाट्याची आवक झाली.
मेथी,शेपू, चुक्याच्या दरात अल्पशी वाढ
पावसाने उघडीप दिल्यानंतर पालेभाज्यांची आवक वाढली आहे. मेथी, शेपू, चुका या पालेभाज्यांच्या दरात अल्पशी वाढ झाली. चाकवत, पुदिन्याच्या दरात घट झाली, अशी माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबिरीच्या सव्वा लाख जुडींची, तसेच मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली. पालेेभाज्यांचे शेकड्यातील दर पुढीलप्रमाणे – कोथिंबीर – ५०० ते १०००, मेथी – ८०० ते १२००, शेपू – ५०० ते ८००, कांदापात – १००० ते १५००, चाकवत – ५०० ते ७००, करडई – ३०० ते ६००, पुदिना – ५०० ते ५००, अंबाडी – ३०० ते ६००, मुळे – ८०० ते १५००, राजगिरा – ४०० ते ७००, चुका – ५०० ते ८००, चवळई – ३०० ते ६००, पालक – ८०० ते १२००
फळांची आवक वाढली
श्रावण महिना सुरू झाल्यानंतर फळांची आवक वाढली. लिंबांची आवक कमी झाली असून, गोणीमागे ५० रुपयांनी वाढ झाली. अन्य फळांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. फळबाजारात रविवारी मोसंबी ३५ ते ४० टन, संत्री १ टन, डाळिंब ४० ते ४५ टन, पपई २५ ते ३० टेम्पो, लिंबे ८०० ते १००० गाेणी, कलिंगड १ ते २ टेम्पो, चिकू ४०० ते ५०० गोणी, पेरू १००० प्लास्टिक जाळी (क्रेट्स), अननस ४ ट्रक, सीताफळ १० ते १२ टन, जांभूळ २ ते ३ टेम्पो अशी आवक झाली.