पुणे : जिल्ह्यातील १९ ग्रामपंचातींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. त्यानुसार संबंधित ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात मतदानाच्या दिवशी १०० मीटर परिसरातील दुकाने, शासकीय व खासगी कार्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच या ग्रामपंचायत क्षेत्रातील शस्त्र परवानाधारकांनी शस्त्रे जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांचे मतदान आणि मतमोजणी शांततेत पार पाडण्याच्यादृष्टीने जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी मतदान असलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात मतदानाच्या दिवशी ४ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते मतमोजणीचा दिवशी ५ ऑगस्टच्या रात्री १२ वाजेपर्यंत मतदान केंद्राच्या परीघापासून १०० मीटर सभोवतालच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. त्यानुसार यी परिसरातील टपऱ्या, स्टॉल, दुकाने, शासकीय व खासगी कार्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण २९ शस्त्र परवानाधारकांकडील शस्त्रे संबंधित पोलीस स्थानकाला जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीबाबत १९ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यानुसार ११ ऑगस्टच्या रात्री १२ वाजेपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीला ११ ऑगस्टपर्यंत स्वतःजवळ परवाना प्राप्त शस्त्रे, हत्यारे, दारुगोळा बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी, कर्मचारी तसेच बँका व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेले सुरक्षा कर्मचारी यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.