पिंपरी-चिंचवड : आयटी हब असलेल्या हिंजवडीत सिमेंट मिक्सरच्या अपघातात महिलांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास भारती मिश्रा (वय – ३४) या महिलेचा मृत्यू झाला असून आयटीयन्स आक्रमक झाले आहेत. अपघातस्थळी पांडवनगर चौकात आयटी अभियंते आणि स्थानिक नागरिकांनी पीएमआरडीए, एमआयडीसीसह शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन केलं.

आंदोलनात मोठ्या प्रमाणावर महिलांचादेखील सहभाग होता. “आम्हाला विकास हवा, मृत्यू नको; निष्पाप बळींना जबाबदार कोण?” अशा आशयाचे फलक हातात घेऊन नागरिकांनी सरकारकडे विकास कामे करत असताना नागरिकांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

शुक्रवारी अकराच्या सुमारास ब्युटीशियन असलेल्या भारती मिश्रा हिंजवडीवरून मानच्या दिशेने जात होत्या. पांडवनगर येथे सिमेंट मिक्सरला ओव्हरटेक करत असताना भारती मिश्रा यांचा दुचाकीवरून तोल जाऊन त्या थेट सिमेंट मिक्सरच्या खाली गेल्या. अंगावरून भला मोठा सिमेंट मिक्सर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षभरात पाच महिलांचा सिमेंट मिक्सरखाली येऊन मृत्यू झाला आहे. या घटनांमुळे हिंजवडीतील आयटी अभियंत्यांनी संताप व्यक्त केला आहे. संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. सिमेंट मिक्सर अपघातप्रकरणी चालक मोहम्मद अब्बास अल्ताफ आणि सिमेंट मिक्सर प्लॅन्टचा मॅनेजर सचिन हंसराज येवलेला पोलिसांनी अटक केली आहे.

हिंजवडीत अवजड वाहतुकीला सकाळी ८ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते रात्री ९ दरम्यान बंदी आहे, अशी माहिती हिंजवडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली आहे. या वेळेव्यतिरिक्त अवजड वाहतूक होत असल्यास संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे. महिनाभरात ५० अवजड वाहतुकीसंदर्भात कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पांढरे यांनी दिली.