पुणे : ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत मुंबईमध्ये एक सदस्यीय, तर पुण्यात चार सदस्यांची प्रभाग रचना असणार आहे. ही प्रभाग रचना स्वीकारण्याची मानसिकता प्रत्येकाने ठेवावी. स्थानिक नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची इच्छा असेल, तरच महापालिका निवडणुकीत युती केली जाईल,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा २६ वा वर्धापन दिन सोहळा बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे झाला. त्या वेळी पवार बोलत होते. ते म्हणाले, ‘राज्यात महायुती असली, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा पद्धतीने लढायच्या, यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाणार आहे. स्थानिक नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची इच्छा असेल, तरच महापालिका निवडणुकीत युती केली जाईल.’
‘चुकीचे वागणाऱ्यांची हयगय नाही’
‘पक्ष एक परिवार आहे. पक्षात गटातटाला थारा नाही. पक्षात चुकीचे वागणाऱ्या कोणाचीही हयगय केली जाणार नाही,’ असे अजित पवार यांनी उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सुनावले. ‘पक्षाच्या प्रवक्त्यांनी भूमिका मांडताना विनाकारण वाद निर्माण होईल, असे वक्तव्य करू नये. नागरिकांच्या हिताची कामे करताना कोणतीही तडजोड केली जाणार नाही. तडजोड केली, तर पक्षाचा पाया कमकुवत होईल.’ असे पवार म्हणाले.
‘मी खिशात पैसे घेऊन बसलोय का?’
‘काही आमदार म्हणतात, की अजित पवार पैसे सोडत नाहीत. मी काय माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय,’ असा सवाल अजित पवार यांनी केला. ‘अंदाजपत्रक सादर केल्यानंतर, प्रत्येक तिमाहीत टप्प्याटप्प्याने रक्कम दिली जाते,’ असे त्यांनी सांगितले.
अधिक निधीची तरतूद
‘अंदाजपत्रकामध्ये अनुसूचित जाती जमातींसाठी गेल्या अंदाजपत्रकाच्या तुलनेत ४१ टक्के अधिक, तर सामाजिक न्याय विभागाला ३८ टक्के जास्त निधी ठेवण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीसाठी ‘लाडकी बहीण’ योजना पुढे आली. यासाठी ४० ते ४५ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आव्हान होते,’ असेही पवार यांनी सांगितले.