पुणे : बारामती तालुक्यात दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे जैनकवाडी पाझर तलाव पूर्ण भरून धोक्याची पातळी निर्माण झाली होती. या परिस्थितीमध्ये प्रसंगावधान राखून ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी सांडव्यातील अडथळा दूर करून पाण्याचा मार्ग मोकळा केल्याने मोठा अनर्थ टाळण्यात यश मिळविले.

स्थानिक शेतकऱ्यांनी सांडव्यातून पुढे जाण्यासाठी ३ फूट उंच रस्ता केला होता. त्यामुळे पाणी बाहेर पडण्यासाठी अडचण होत होती. तलावात पाण्याची पातळी खूप वाढू लागल्याने तलाव फुटण्याची शक्यता लक्षात घेता ग्रामस्थांनी तत्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला. त्यावर ग्रामपंचायत अधिकारी अतुल गरगडे यांनी जेसीबीद्वारे अडथळा दूर केल्याची माहिती गटविकास अधिकारी डाॅ. अनिल बागल यांनी दिली. यामुळे ग्रामपंचायत पाणी पुरवठा विहीर, सुमारे ५० घरे आणि परिसरातील शेतजमिनी, शेतमाल, घरासोबतच पशुधनाचे नुकसान टाळता आल्याचेही त्यांनी सांगितले.

इंदापूरमधील चिखलीत युवकांची प्रशासनाला साथ

इंदापूर तालुक्यातील चिखली या गावात बारामती-कळंब-बावडा मार्गावर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. त्यावेळी तेथे नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे, ग्राम महसूल अधिकारी गोरख बारवकर, स्थानिक ग्राम महसूल सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायतचे सरपंच आणि गावातील युवकांनी बाधित कुटुंबे जिल्हा परिषद शाळा येथे स्थलांतरित केली. रस्ता बंद झाल्यामुळे तेथून जाणारे अंदाजे २०० प्रवाशांची राहण्याची आणि जेवणाची सोय संबंधित सरपंच तसेच गावातील नागरिकांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अतिवृष्टीमुळे नीरा नदी तसेच ओढ्यांना पूर आला. त्यामुळे ओढे आणि नदीलगत लोकवस्तीमध्ये पुराचे पाणी अचानक घरामध्ये घुसून अंदाजे ५० गावांमधील १ हजार ७५५ कुटुंबे बाधित झाल्याने या कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. तर, जांब येथील पुराच्या पाण्यात अडकलेल्या दोन मजुरांची तेथील पोलीस पाटील आणि नागरिकांनी अथक परिश्रम करून सुटका केली. निरवांगी येथे नीरा नदीकाठी असलेल्या नंदिकेश्वर मंदिरातील एका वृद्ध व्यक्तीची सुटका केली. ही कुटुंबे बाहेर काढताना ग्राम महसूल अधिकारी आणि पोलीस पाटील यांनी स्पीड बोट वापरून धैर्याने त्यांची सुटका केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.