व्यक्तिनिर्माण, समाज संघटन, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रसेवा या प्रमुख तत्त्वांवर काम करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार होऊन राजकीय क्षेत्रात कार्यरत झालेल्या भाजपच्या आजवरच्या नेत्यांनी चारित्र्याला प्राधान्य दिले. शिस्तबद्ध, समर्पित भावनेने काम करणाऱ्या नेत्यांमुळे या पक्षाची स्वच्छ प्रतिमा जनमानसात रुजली. मात्र, बेरजेचे राजकारण आणि सत्तेच्या हव्यासाने तत्त्वांना मुरड घालून झालेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या खोगीरभरतीने शहरातील भाजपचा ‘नवा चेहरा’ पुणेकरांना दिसू लागला आहे. पक्षाची ताकत वाढविण्यासाठी पूर्वाश्रमीच्या कर्तृत्वाकडे काणाडोळा केला जाऊ लागल्याने नैतिकतेची पातळी काही पदाधिकाऱ्यांकडून ओलांडली जाऊ लागली आहे. त्यातूनच गुन्हेगारी प्रवृत्ती बळावून भाजपचा हा नवा चेहरा पुणेकरांना दिसू लागला आहे. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये पुणेकर हा बदल स्वीकारणार का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

पुण्यातील भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांकडून झालेले वर्तन मूळ भाजपच्या विचारसरणीला धक्का देणारे आणि पक्षाची प्रतिमा डागाळणारे आहे. भाजपच्या कामगार आघाडीचे माजी शहराध्यक्ष ओंकार कदम यांच्याविरुद्ध पुणे महापालिकेतील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला मानसिक त्रास आणि विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. महापालिका आयुक्तांनी कदम यांना मनपाच्या कार्यालयात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. त्यावरून आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. दुसरे प्रकरण भाजपचे शहर महामंत्री प्रमोद कोंढरे यांच्याविरुद्ध वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कोंढरे यांनी पदाचा राजीनामा दिला असून, शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी राजीनामा स्वीकारला आहे. ही दोन्ही प्रकरणे न्यायप्रविष्ट असून, पोलीस तपास पूर्ण होऊन सत्य पुढे येईल. मात्र, या प्रकरणांनी पुण्यातील भाजपच्या प्रतिमेला तडा गेला आहे, हे मात्र नाकारता येणार नाही.

गेल्या महिनाभर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष हा वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत होता. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे हा या पक्षाचा मुळशीचा माजी तालुकाध्यक्ष होता. त्यानंतर या पक्षातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पदाधिकाऱ्यांबाबत चर्चा झाली. त्यावरून या पक्षाला विरोधी पक्षांनी लक्ष्य केले. आता ती वेळ भाजपवर आली आहे. ती अधिक धक्कादायक, कारण या पक्षाची कार्यपद्धती आणि प्रतिमा ही शिस्तीने काम करणारा पक्ष, अशी आजवर राहिलेली होती. त्यास आता मात्र तडा गेला आहे.

राजकारणात सर्व काही माफ असते, या विचाराने भाजपमध्ये अन्य पक्षांतील पदाधिकाऱ्यांची खोगीरभरती होऊ लागली आहे. त्यामागे पक्षाचे बळ वाढविणे, हा शुद्ध हेतू असला तरी पदाधिकाऱ्यांकडून बदनामी होईल, असे कृत्य घडल्यास पक्ष मजबूत होण्याऐवजी आजवर पक्षाच्या उभारणीसाठी केलेल्या कामावर पाणी फिरते. असा अनुभव पुण्यातील भाजपला घ्यावा लागत आहे. पदाधिकाऱ्यांकडून होणाऱ्या गैरकृत्यानंतर संबंधित पदाधिकाऱ्यांना पक्षातून काढून टाकण्याची नामुष्की भाजपवर सातत्याने येत आहे.

महापालिका निवडणुकांमध्ये भाजप स्वबळावर लढण्यासाठी आग्रही आहे. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष आणि शिवसेना (शिंदे) हे पक्ष महायुती म्हणून लढण्यास इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष मात्र वेळप्रसंगी स्वबळावर लढण्याच्या तयारीला लागला आहे. शिवसेना (शिंदे) पक्षाची शहरातील ताकद पाहता स्वबळावर लढणे, हे या पक्षाच्या हिताचे नाही. प्रमोद कोंढरे प्रकरणानंतर शिवसेना (शिंदे) पक्षाबरोबर विरोधी पक्षांना आयते कोलीत मिळाले. महापालिकांच्या निवडणुकांपूर्वी भाजपचा नवा चेहरा मतदारांसमोर आणण्याची नामी संधी चालून आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेना (शिंदे) पक्षाचे पुणे महानगरप्रमुख, माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी कोंढरे प्रकरणाच्या निमित्ताने कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्यावर टीकेचा भडीमार केला. अर्थात, त्यामागे कसब्याचे राजकारण कारणीभूत आहे. मात्र, फटका भाजपच्या प्रतिमेला बसत आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत मिळालेली एकहाती सत्ता आणि पक्षाची वाढलेली ताकद यामुळे पदाधिकाऱ्यांकडून चुकीचे वर्तन होण्याची शक्यता नाकारता येत नाही; पण एका प्रकरणाने हा पक्षही इतरांपेक्षा वेगळा नाही, हे दिसून येते. भाजपचा हा ‘नवा चेहरा’ आगामी महापालिका निवडणुकीत मतदारांना आवडेल का, याचे भान पदाधिकाऱ्यांनी ठेवले, तरी पुरे sujit.tambade@expressindia.com