पुणे : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या ४८ मतदारसंघांतील सुमारे सव्वानऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून मतदारांची सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यात आहे. तर नंदूरबार, गोंदिया, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांत महिला मतदारांची संख्या अधिक असून त्या सर्वानी मतदानाचा हक्क बजावला तर त्यांची मते निकालावर प्रभाव पाडू शकतात. 

राज्यात ८ एप्रिलपर्यंत एकूण नऊ कोटी २४ लाख ९१ हजार ८०६ मतदारांची नोंद झाली आहे. यामध्ये चार कोटी ८० लाख ८१ हजार ६३८ पुरुष,  चार कोटी ४४ लाख चार हजार ५५१ महिला आणि ५६१७ तृतीयपंथी मतदार आहेत. 

हेही वाचा >>>मोदींची वक्रदृष्टी पडल्यास तोंडाला फेस येईल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ८२ लाख ८२ हजार ३६३ मतदार आहेत. त्याखालोखाल मुंबई उपनगरात ७३ लाख ५६ हजार ५९६, ठाणे जिल्ह्यात ६५ लाख ७९ हजार ५८८, नाशिक ४८ लाख आठ हजार ४९९, तर नागपूर जिल्ह्यात ४२ लाख ७२ हजार ३६६ मतदार आहेत. रत्नागिरी, नंदूरबार, गोंदिया आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत महिला मतदारांची संख्या अधिक आहे.  नगर, सोलापूर, जळगाव, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या पाच जिल्ह्यांमध्ये ३० लाखांहून अधिक मतदार आहेत. नगरमध्ये ३६ लाख ४७ हजार २५२, सोलापूर जिल्ह्यात ३६ लाख ४७ हजार १४१, जळगावमध्ये ३५ लाख २२ हजार २८९ मतदार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारसंख्या ३१ लाख ७२ हजार ७९७ तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ३० लाख ४८ हजार ४४५ मतदार आहेत. याशिवाय बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, रायगड, मुंबई शहर, बीड, सातारा, सांगली आणि पालघर या दहा जिल्ह्यांमध्ये २० लाखांहून अधिक मतदार आहेत, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.

निवडणूक आयोगाकडील माहितीनुसार पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदारांची नोंद आहे, तर चार जिल्ह्यांत महिला मतदारांचा टक्का प्रभावी आहे. 

महिला मतदारांचा प्रभाव 

जिल्हा         पुरुष            महिला          तृतीयपंथी 

रत्नागिरी    ६,३१,०१२       ६,७२,९१६      ११

नंदूरबार      ६,३७,६०९      ६,३९,३२०      १२

गोंदिया   ५,४१,२७२       ५,५१,२६४        १०

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिंधुदुर्ग  ३,३०,७१९        ३,३२०२५         १