पिंपरी : ‘आळंदीत साडेचारशे एकर जागेमध्ये ज्ञानपीठाचे काम केले जाणार आहे. त्यासाठी ७०१ कोटी रुपयांचा आराखडा तयार झाला आहे. भागवत विचार, परंपरा, संस्कृती, सनातन विचार रुजला पाहिजे, या दृष्टीने सर्व प्रकारचे ज्ञान ज्ञानपीठाच्या माध्यमातून शतकानुशतके पुढे जाईल. जगाला हेवा वाटेल, असे ‘संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ’ उभारण्यात येईल,’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्याला फडणवीस यांनी उपस्थिती लावली. त्या वेळी ते बोलत होते. आळंदी देवस्थानाचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळाप्रमुख डॉ. भावार्थ देखणे, राजेंद्र उमाप या वेळी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, ‘मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो. त्या वेळी आळंदीतील मंदिराच्या सर्व जागांवर आरक्षण होते. ते मी उठविले. आता ज्ञानपीठ माझ्याच हाताने व्हावे, असे ईश्वराने योजिले असेल. त्यामुळे सर्वांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनता आले. या आशीर्वादाच्या कर्जात जीवनभर राहील. त्यातून थोडा उतराई होण्यासाठी ज्ञानपीठ निश्चितपणे तयार केले जाईल. ज्ञानपीठाच्या माध्यमातून भारतीय आध्यात्मिक परंपरेतील मानवी कल्याणाचा शाश्वत विचार जगभरात जाईल.
‘देशात परकीय आक्रमण होत असताना भागवत धर्माला जिवंत ठेवण्याचे कार्य वारकरी संप्रदायाने आणि संतांनी केले. त्यामुळे आपला विचार, संस्कृती आणि धर्म कोणीही नष्ट करू शकला नाही. परकीय आक्रमणावेळी संत समाजात सुविचार रुजवत होते. त्यामुळे चांगल्या विचारांची परंपरा आजही सुरू आहे,’ असेही फडणवीस म्हणाले.
‘इंद्रायणी नदी अतिशय प्रदूषित झाली आहे. इंद्रायणी स्वच्छतेचा विकास आराखडा तयार केला होता. मध्यंतरी गतिरोधक आले होते. ते दूर झाले. आता सर्व प्रकारच्या मान्यता घेऊन आराखडा केंद्र सरकारकडे निधीसाठी पाठविला आहे. लवकरच आराखडा केंद्र सरकारकडून मंजूर करून घेतला जाईल,’ असे सांगून फडणवीस म्हणाले, ‘या आराखड्याच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड महापालिकेसह ३९ गावे, शहरांचे सांडपाणी इंद्रायणी नदीत सोडले जाते. हे सर्व पाणी शुद्ध केले जाईल. शुद्ध पाणीच नदीत सोडले जाईल, अशा प्रकारचा आराखडा तयार केला आहे. त्याची निविदाही काढली आहे. लवकरच कार्यारंभ आदेश दिला जाईल. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी कालावधी लागतो. ही कामे कमी वेळेत पूर्ण केली जातील. इंद्रायणी नदीला निर्मळ, स्वच्छ करण्याचा शब्द देतो. इंद्रायणी नदीत स्नान केल्यानंतर पवित्र वाटावे. इंद्रायणी नदीचे जलपूजन वाया जाणार नाही. इंद्रायणीचे जल पूजनीय होईल,’ असेही फडणवीस यांनी सांगितले.
वारकरी संप्रदायामुळे राज्य अग्रेसर
‘संत ज्ञानेश्वर माउलींनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि संत तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला. संतांची ही मोठी परंपरा आपल्याला लाभली आहे. जात, पंथ, धर्मविरहित समाज निर्माण करण्याचे कार्य संतांनी केले. वारकरी प्रत्येकात पांडुरंग पाहतो. वारकरी संप्रदायाने रुजविलेल्या परंपरेमुळे राज्य अग्रेसर आहे,’ असेही फडणवीस म्हणाले.